सीबीआय पथकाचा पाच तास कसून तपास, वाधवान बंधूंचीही उपस्थिती
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
येस बॅक आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या वाधवान बंधु यांच्या तपासासाठी सीबीआयच्या विशेष तपास पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यात हजेरी लावुन तपास केला. यावेळी तपास पथकासोबत वाधवान बंधु हे देखील होते. पाच तास तपास केल्यानंतर वाधवान बंधु यांना सोबत घेवुन सीबीआयचे पथक मुंबईकडे रवाना झाले.
प्रसिध्द उद्योगपती धीरज वाधवान व कपील वाधवान हे येस बॅकेच्या आर्थिक घोटाळय़ातील आरोपी असुन सीबीआयच्या पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या वाधवान हाऊस या बंगल्यातुन 23 एप्रिल रोजी ताब्यात घेतले. तेव्हापासुन ते सीबीआय कोठडीत आहेत. सात मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान, बुधवारी त्यांच्यावर असलेल्या आरोपाच्या तपासासाठी सीबीआयचे विशेष तपास पथकाने महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर हजेरी लावली. सीबीआयच्या दोन विशेष वाहनातून त्यांना आज दुपारी येथे आणण्यात आले. येथे येण्यापुर्वी येथील स्थानिक पोलिसांना कळविण्यात आले होते. सीबीआयच्या सुचनेनुसार दुपारी बारा वाजता स्थानिक पोलिसांचे पथक वेण्णालेक येथे पोहचले. तेथुन सीबीआयच्या पथका बरोबर सर्व येथील वाधवान हाउस येथे पोहचले. तेथे स्थानिक पोलिसांना बाहेर काढुन सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक व त्यांच्या पथकाने तब्बल पाच तास तपास केला. यावेळी बंगल्याची झाडाझडती घेवुन तेथील कागदपत्रांची पाहणी केली या प्रकरणी पुन्हा वाधवान बंधु यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता वाधवान बंधु यांना सोबत घेवनु सीबीआयच्या पथकाने येथील स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावली. येथील सोपस्कार पूर्ण करून साडेपाच वाजता सीबीआयचे विशेष तपास पथकाने मुंबईकडे कुच केली.
लोणावळा येथे एका खाजगी बंगल्यात असताना अचानक आठ मार्च रोजी वाधवान कुटुंब हे महाबळेश्वरला आले तेव्हा पासुन ते सीबीआयच्या रडारवर पोहचले येथील स्थानिक पोलिसांनी देखिल वाधवान यांचेवर काही गुन्हे दाखल केले आहेत. महाबळेश्वर येथे आल्यानंतर वाधवान कुटूंबाला प्रथम जिल्हा प्रशासनाने इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन केले. त्या नंतर पुन्हा 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले. होम क्वारंटाईनचा कालावधी संपुष्टात येण्यापुर्वीच सीबीआयच्या पथकाने येस बॅक घोटाळाप्रकरणी धीरज वाधवान व कपील वाधवान यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व अटक करून मुंबईला नेले. तेव्हापासुन हे वाधवान बंधु हे सीबीआय च्या कस्टडीत आहेत वाधवान बंधु यांची पोलिस कस्टडी ही सात मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे गुरुवारी वाधवान यांच्या कस्टडीत वाढ होणार की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागुन राहिले आहे.
दरम्यान, जरी गुरुवारी त्यांना पोलिस कोठडी वाढवुन मिळाली नाही तरी त्यांना तातडीने जामिन मिळेल याची शक्यता कमी दिसुन येत आहे. सीबीआय नंतर कदाचित ईडी चे पथक वाधवान बंधु यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाधवान बंधु यांना जामिनावार सुटण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.