प्रतिनिधी /वाळपई
समाजाच्या सर्वांगीण विकासात वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्य मोलाचे आहे. आर्थिक दृष्टय़ा कमकुवत घटकांना शैक्षणिक दृष्टय़ा मदत करून समाजातील आवश्यक गरज पूर्ण करण्यासाठी या मंडळाने केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केले आहे. वाळपई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सौ विजयादेवी राणे स्थायी समितीचे अध्यक्ष नरहरी हळदणकर,नगरसेवक विनोद हळदणकर, महादेव दातये, सतेंद्र कर्पे, विजय कुडतरकर, नितीन पोकळे, विनोद हळदणकर, ओंकार परोब, शैलेश पोकळे,माजी नगरसेवक धर्मेंद्र सांळुखे, संजय हळदणकर, किरण नार्वेकर, दिनेश शिरोडकर, गौरीश पोकळे, कालिदास मणेरकर, राजू मणेरकर यांची उपस्थिती होती.
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना ज्या उद्देशाने राबविण्यात आली तो उद्देश पुढे नेण्यासाठी हे मंडळ पूर्णपणे प्रयत्न करतील अशी आशा प्रतापसिंह राणे यानी व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष नरहरी हळदणकर यांनी सांगितले की गेल्या काही वर्षापासून या मंडळाच्या कार्याचा विस्तार होत आहे. फक्त गणेश चतुर्थी साजरी न करता या चतुर्थीच्या माध्यमातून वेगवेगळय़ा स्वरूपातील कलाकाराना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून मंडळातर्फे कार्य करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळय़ा स्तरावर आर्थिक दृष्टय़ा गरजवंताना यापूर्वी मदत केल्याचे उद्गार काढले .मंडळाचे प्रत्येक कार्यकर्ते या मंडळाचे कार्य समाजाभिमुख व्हावे यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत असल्याचे नारहरी हळदणकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रतापसिंह राणे यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची संवाद साधला.