इस्लामपूर/प्रतिनिधी
येथील तहसीलदार रविंद्र सबनीस यांची पुणे जिल्हयातील जुन्नर येथे बदली झाली असून त्यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर हातकणंगले येथून प्रदीप उबाळे हे बदलून येत आहेत. शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी या बदलीचे आदेश केले. उबाळे हे मंगळवार पर्यंत पदभार घेण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने ही बदली झाली आहे. गेल्या तीन वर्षात सबनीस यांनी वाळवा (इस्लामपूर) तहसीलदार म्हणून उत्कृष्ट काम केले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी सुरु आहे. त्यामुळे महामारी नियंत्रणासाठीच त्यांचा बराचसा काळ गेला. त्यांच्या कार्यकाळातच येथील नवीन तहसील कार्यालय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले. दरम्यान उद्घाटनानंतर ठाकरे यांच्या उपस्थितीत तहसिलदार सबनीस यांना त्यांच्या दालनातील खुर्चीत बसण्याचा मान मिळाला.
वाळवा तालुक्यात काम करताना महसूल व अन्य अधिकाऱ्यांना सामाजिक व राजकीय दबावात काम करावे लागते. या परिस्थितीतही सबनीस यांनी कुठल्याही वादात न अडकता आपली कारकीर्द पूर्ण केली. कोरोनाचा कहर कमी झाला असून महसूल संबंधी अनेक कामे प्रलंबित आहेत. शिवाय तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. नव्याने येणारे तहसिलदार उबाळे यांना हे
आव्हान पेलावे लागणार आहे.