पेढे परशुराममधील पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर,
प्रतिनिधी/ चिपळूण
पेढे नवीन वसाहत मधील सुधीर पाटील यांचा अपघाती मृत्यू मनाला चटका लावून गेलो. आठवडाभरातच खानापूरमधील नवीन घरकुलाची वास्तूशांत होणार असल्याने कुटुंब आनंदीत होते. मात्र गुरूवारी दिवाळीच्या पहाटे मित्राला भेटण्यास गेलेल्या मुलगा शुभमचा अपघाती मृत्यू झाला. शुभमचा मृतदेह पाहण्याची वेळ पाटील कुटुंबावर आली. क्षणात घडलेल्या या घटनेने पाटील कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
शुभम मुळ बेळगांव जिल्हय़ातील खानापूर तालुक्यातील माडीगुंजीचा. वडील सुधीर 30 वर्षापूर्वीच चिपळुणात आले. सुरूवातीला गोवळकोट येथे भाडय़ाच्या खोलीत राहत होते. ते गवंडी काम तर पत्नी धुणीभांडी करून कुटुंब चालवत होते. त्यांच्या शुभम आणि सौरभ या दोन्ही मुलांचा जन्मही येथेच झाला. त्यांनी पेढे नवीन वसाहतीत स्वतःचे घर बांधत मुलांचे शिक्षण पूर्ण केले. शुभम बारावीनंतर लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनीत कामाला होता.
गुरूवारी तो आपल्या मित्राला भेटण्यासाठी नातूनगर परिसरात दुचाकीवरून गेला होता. तेथून परतताना रात्री 10.45 च्या सुमारस नातूनगर येथे साखरपा ते विरार, अर्नाळा एसटी बसला ओव्हरटेक करताना शुभमचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीला एसटीची धडक बसली. यात शुभमचा दुचाकीसह बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच पेढेसह माडीगुंजी गावावर शोककळा पसरली.
शुभमचे वडील सुधीर पाटील यांनी माडीगुंजी येथील वडिलोपार्जीत घराची नव्याने बांधणी केली होती. त्याची वास्तूशांत आठवडाभरात निश्चित केली होती. दिवाळी पेढे येथे घरात साजरी करून माडीगुंजीला जाऊन नव्या घराच्या वास्तूशांतीची तयारी पाटील कुटुंबाने चालवली होती. गुरूवारी साऱया कुटुंबाने सकाळी आनंदाने दिवाळी साजरी केली. मात्र रात्री शुभमच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर क्षणात पाटील कुटूंब हादरून गेले.
शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर शुभमचा मृतदेह पाटील कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला. चिपळूण येथील बेळगांव सीमावासीय मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यानीही पाटील यांच्या घरी धाव घेत आधार व मदतीचा हात दिला. त्यानंतर माडीगुंजी येथे रात्री 9 वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात वडील, आई आणि भाऊ असा परिवार आहे. शुभमच्या मृत्यूमुळे मांडीगुंजी येथे दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द करण्यात आला..
एसटी बसखाली चिरडून शुभमचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगरनजीक एसटी बसखाली चिरडून शुभम सुधीर पाटील (25, पेढे-चिपळूण) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10.45 च्या सुमारास घडली.
चालक समीर चंद्रकांत बने (41, कोसुंब-संगमेश्वर) आपल्या ताब्यातील साखरपा-विरार अर्नाळा बस (एम.एच. 09/इ.एम.9650) घेवून जात होते. याचवेळी दुचाकीवरून (एम.एच.08/ए.एस. 3491 ) जाणाऱया शुभमचा ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी बसखाली सापडून जागीच मृत्यू झाला. कशेडी महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक ए. पी. चांदणे, सहाय्यक पोलीस फौजदार यशवंत बोडकर, हेडकॉन्स्टेबल साखरकर, पोलीस उपनिरीक्षक झेंडे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबाही झाला.