प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे तालुका करवीर येथील कुडित्रे नवीन पुलाचे ५ जुलै रोजी कोगे गावातील विविध महिलांनी गारवा आणत पूलाचे पूजन केले. याप्रसंगी बोलताना लोकांचा वाहतुकीचा प्रश्न मिटविण्यात यशस्वी झालो असे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
कोगे-कुडित्रे दरम्यानचा भोगावती नदीवरील नवीन पुलामुळे गेल्या अनेक वर्षांचा वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागला आहे. हा पुल व्हावा अशी कोगे, महे, बीड ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी होती. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत जवळपास ८ कोटी खर्चुन हा पुल उभारला आहे. म्हणून येथील विविध महिला मंडळाच्यावतीने आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पुलावर गारवा पूजन करण्यात आले. हा कार्यक्रम माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थितीत होती.
यावेळी ‘कुंभी’ चे संचालक यांच्यासह महिला, विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.आपण आमदार असताना आपल्या काळात मतदारसंघात सात मोठे पुल बांधण्यात आले. कोगे-कुडित्रे पुल पुर्ण झाला आहे. लोकांना होणारा वाहतूकीचा त्रास मिटविण्यात यशस्वी झालो.
महिलांनी केलेला सत्कार मनाला उभारी देणारा आहे, असे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. तसेच कुंभी कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील यांनी आमच्या गावातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कुडित्रे व सांगरुळ फाट्यावरती जात आहेत. पावसाळ्यामध्ये त्यांना फिरून जावे लागत होते. या पुलामुळे त्यांची अडचण दूर झाल्याने कोगे गावाच्या व ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार नरकेसाहेबांचे आभार मानले.