भाजपकडून सरकारचे अभिनंदन
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टीने राज्याची चौफेर घोडदौड सुरू असून त्यात केंद्र सरकारचेही संपूर्ण सहकार्य मिळत असल्याने हा विकास करणे शक्य झाले आहे, असे मत गिरीराज पै वेर्णेकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आमदार उल्हास तुयेकर, आमदार प्रेsमेंद्र शेट आणि प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांची उपस्थिती होती. एकत्रित सामाजिक विकासाच्या बाबतीत गोव्याला देशातील तिसऱया क्रमांकाचे राज्य म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. यापूर्वीही राज्याला आरोग्य सेवा, जलवितरण, स्वच्छता वैयक्तिक सुरक्षा, निवास, यासारख्या दैनदिन जीवनातील वेगवेगळ्या 12 निकषांवर मानांकने, पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रत्येक गोमंतकीयासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. याकामी मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळ सहकाऱयांचे योगदान मिळाले असून सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत, असे वेर्णेकर म्हणाले.
श्री. म्हांबरे यांनी बोलताना, गोवा तसेच केंद्रातही अत्यंत प्रभावीपणे कार्य करणारे भाजपचे डबल इंजिन सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यात त्यांना मंत्री नितीन गडकरी यांची सुयोग्य साथ लाभत आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच 2014 पासून आजपर्यंत गोव्यात सुमारे सात हजार कोटी खर्चाचे प्रकल्प आणि अन्य विकासकामे पूर्ण करण्यात आली असून, भविष्यात आणखी 2400 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत, अशी माहिती दिली. अशाप्रकारे गोव्यासाठी दिलेल्या योगदानासाठी गोवा भाजपतर्फे मोदी आणि गडकरी यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, असे ते म्हणाले.
भाजप सरकारने घेतलेल्या असंख्य लोकभिमुख निर्णयांमुळे सरकारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक योजनेला उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत असल्याचे श्री. शेट यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे अंतर्गत आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोकांनी विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या असून भविष्यात आणखीही लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे, असे ते म्हणाले.
श्री. तुयेकर यांनीही सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. राज्यातील विविध शाळा तसेच हायस्कुलना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देण्याची कल्पक अशी योजना मुख्यमंत्र्यांनी राबविली आहे. राज्याच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती भावी पिढीच्या कायम स्मरणात राहाव्या हा त्यामागील उद्देश होता. मुख्यमंत्र्यांचे हे एक कौतुकास्पद असे कार्य आहे, असे ते पुढे म्हणाले.