कुणकेश्वर ग्रा. पं. निवडणूकः
हक्काच्या माणसांना मते द्या- अजय नाणेरकर
वार्ताहर / देवगड:
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांचा प्रचार सर्व प्रभागातील घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेत सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रित मिळून उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक आम्ही लढत असून गावातील लोकांना सर्व सेवासुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही विजयी झाल्यानंतर निश्चितच करणार आहोत, असे आघाडीचे प्रचारप्रमुख अजय सुधाकर नाणेरकर व शिवसेना शाखाप्रमुख संतोष लाड यांनी सांगितले.
कुणकेश्वर ग्रामपंचायत ही राजकीयदृष्टय़ा निवडणुकीमध्ये लक्षवेधी ठरणार आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपचे पॅनेल अशी थेट लढत आहे. तर काही अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कुणकेश्वर महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये प्रभाग क्र. 1 मधून अंकुश दत्ताराम पेडणेकर, अस्मिता संतोष पेडणेकर, रमेश शांताराम आईर, प्रभाग क्र. 2 मधून मनीषा मोहन परब, सायली भरत वाळके, दिनेश महादेव धुवाळी, प्रभाग क्र. 3 मधून रसिका रामदास पेडणेकर, मृणाली महेश घाडी, हेमंत वसंत वातकर हे निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीने आपल्या जाहिरनाम्यामध्ये गावातील सर्व प्रभागातील तसेच देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. तसेच आजपर्यंत प्रभागामध्ये जी विकासकामे झालीत, ती केवळ कागदोपत्री झाली आहेत. विकासकामासाठी निधी मंजूर आहे. पण प्रत्यक्षात कामांची विदारक स्थिती दिसत आहे. आजपर्यंत पैशाच्या आमिषाला भुलून मतदारांनी चुकीच्या लोकांकडे सत्ता दिली. त्यांच्या मनाप्रमाणे वागून आपण फसलो आहोत. यातून बाहेर पडण्याची हीच संधी आहे. त्यासाठी कुणकेश्वर गावाच्या विकासासाठी हक्काची माणसे ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाणे आवश्यक आहे. कोणत्याही आमिषाला न भूलता योग्य उमेदवार जे महाविकास आघाडीने आपल्या सेवेसाठी उभे केलेत, त्यांना विजयी करण्याचे आवाहन नाणेरकर व लाड यांनी केले आहे.
तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात
नाणेरकर म्हणाले, महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या तीनही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कुणकेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचारात उतरले आहे. मतदारांचा आमच्या पॅनेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. निश्चितच आमचा विजय मोठय़ा मतांनी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.