माकपचा भाजप-तृणमूलवर हल्लाबोल – जातीय राजकारणावरून टीका
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील जनतेला आता विकासाभिमुख सरकारची आवश्यकता असून लोक वाढत्या गुन्हेगारीला कंटाळले असल्याचा दावा माकपचे नेते सूर्या कांत मिश्रा यांनी केला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या जातीयवादी राजकारणावर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. येथील ब्रिगेड परेड मैदानावर आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
तृणमूल काँग्रेसच्या काळात राज्यातील लोकांना बेरोजगारीचा सामनाही करावा लागला. तसेच गुन्हेगारी घटनांमध्येही भयंकर वाढ झाली. जातीय हिंसाचारही वाढला असून येत्या निवडणुकीत मतदारांनी डाव्या आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन माकप सचिव सूर्या कांत मिश्रा यांनी केले. डाव्या पक्षांसह काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तास्थानी आल्यानंतर रोजगार आणि औद्योगिक विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट पेले.
भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या जातीयवादी राजकारणामुळे राज्यातील जनतेमध्ये गट-तट निर्माण होऊ लागले आहेत. या गटा-तटाच्या राजकारणातूनच एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा हल्ल्यांमुळे देशात राज्याचे नाव खराब होत असून त्याला भाजप-तृणमूल हे पक्षच जबाबदार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला.
,,,,,,,,,,,,,