कोविड तांत्रिक समिती बैठकीत निर्णय : सहावी ते आठवीचे वर्ग 6 सप्टेंबरपासून सुरू : नवी मार्गसूची 13 पर्यंत
सहावी ते आठवी ‘ऑफलाईन’ पहिली ते पाचवी ‘ऑनलाईन’च
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्याने राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. येत्या दि. 6 सप्टेंबरपासून सहावी, सातवी आणि आठवीचे वर्गही सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आठवडय़ातील पाच दिवस दिवसाआड वर्ग भरविता येणार आहे. मात्र, पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरविण्याबाबत महिनाभरानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाचवीपर्यंतचे वर्ग सध्यातरी सुरू होणार नसल्याने ते ‘ऑनलाईन’च सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर महसूलमंत्री आर. अशोक यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयांची माहिती दिली. सध्या पदव्युत्तर, पदवी, पदवीपूर्व महाविद्यालये सुरू आहेत. तर माध्यमिक शालेय विभागातील नववी आणि दहावीचे वर्ग अर्धा दिवस भरविले जात आहेत. उर्वरित वर्गही सुरू करावेत, अशी मागणी पालक आणि शिक्षकांमधून झाल्याने सरकारने कोरोना पॉझिटिव्हिटी दर 2 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱया तालुक्यांमधील सहावी ते आठवीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 6 सप्टेंबरपासून आठवडय़ातून पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार या कालावधीत विद्यार्थ्यांच्या 50 टक्के हजेरीसह दिवसाआड वर्ग भरविता येणार आहेत.
त्याकरिता बॅच पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार शाळा परिसराची स्वच्छतेसाठी राखून ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री आर. अशोक यांनी दिली.
शाळा सुरू झाल्यापासून 6,472 मुलांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 14 विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळेच सहावीपासूनचे पुढील वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय शिक्षकांचेही लसीकरण करण्यात आले आहे. 2.61 लाख शिक्षकांपैकी 1.10 लाख शिक्षकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पालकांचे संमतीपत्र सक्तीचे…
शाळांमध्ये येणाऱया मुलांना पालकांचे संमतीपत्र सक्तीचे आहे. दुपारपर्यंतच वर्ग भरविले जाणार आहेत. मुलांनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. ऑफलाईन वर्गांबरोबरच ऑनलाईन क्लासही चालणार आहेत. इच्छुक मुले ऑनलाईन क्लासना हजर राहू शकतात, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. मुलांची शैक्षणिक प्रगती आणि भवितव्याच्या दृष्टीने सुरक्षा उपाय केल्यानंतरच वर्ग भरविण्यात येत आहे. अलिकडेच नववी, दहावी आणि पदवीपूर्व प्रथम आणि द्वितीय वर्षाचे वर्ग भरविण्यात आले आहेत. याला उत्तम प्रतिसाद मिळत आहेत, असे ते म्हणाले.
सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत 5 रोजी अंतिम निर्णय
कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारने राज्यात गणेशोत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यावर निर्बंध घातले आहेत. यासंबंधीची मार्गसूचीही जारी करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षा नियमांचे पालन करून गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळे, विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी भाजपमधील नेत्यांनीही केली होती. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. सोमवारी कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी सुमारे 45 मिनिटे चर्चा करण्यात आली. परंतु, सणांच्या कालावधीत निर्बंध शिथिल केल्यास कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका आहे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात नियम आणखी शिथिल करावेत का?, याबाबत मुख्यमंत्री 5 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक घेणार आहेत.
जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱयांची मते जाणून घेऊन मुख्यमंत्री बोम्माई गणेशोत्सवासंबंधी निर्णय घेणार असल्याची माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करणे हा भावनिक विचार आहे.
त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करणाऱया संघ-संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसप्रमुखांना देण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर कोरोना परिस्थितीचा विचार करून पुन्हा एकदा चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाबाबत सकारात्मक निर्णय होण्याचा विश्वास आहे. परंतु, केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. जनतेचे आरोग्यहित देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व बाबींचा गंभीरपणे विचार करून पुढील पाऊल उचलले जाणार आहे, असेही मंत्री आर. अशोक म्हणाले.