खरेदीदारांची पाठ, रस्त्यावर शांतता
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. शहरातील समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, मारूती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, काकतीवेस, शनिवारखुंट यासह इतर ठिकाणी देखील नागरिकांची संख्या नगण्य होती. दररोज हजारो नागरिकांनी गजबजणारी बाजारपेठ विकेंड कर्फ्यूमुळे शनिवारी पहिल्याच दिवशी थंडावली असल्याचे दिसून आले.
शनिवारी विकेंड कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेतील मारूती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड आदी ठिकाणची दुकाने बंद होती. तर रविवारपेठेतील काही व्यापाऱयांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. मात्र कर्फ्यूमुळे नागरिक बाजारात आले नसल्याने शुकशुकाट पसरला होता. काही किरकोळ व्यापाऱयांनी सकाळच्या सत्रात दुकाने सुरू केली होती. मात्र नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने दुकाने बंद केली.
विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिक धास्तीने घराबाहेर पडले नाहीत. तसेच बाजारपेठेकडे देखील नागरिकांनी पाठ फिरविल्याने मुख्य बाजारपेठेत शांतता पसरली होती. बाजारपेठेतीलही गणपतगल्ली, कर्नाटक चौक आदी ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाजारपेठ बंद झाल्याने मोठा परिणाम झाला असून, दैनंदिन उलाढालही थांबली होती. परिणामी व्यापारी, विपेते, हमाल व कष्टकऱयांना याचा फटका बसला.
विकेंड कर्फ्यू काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा देण्यात आली असली तरी धास्तीने नागरिक बाजारपेठेकडे फिरकले नाहीत. बाजारात मेडिकल, हॉस्पिटल, भाजीपाला व इतर गोष्टी सुरू होत्या. मात्र रस्त्यावर लावलेले बॅरिकेड्स, पोलीस बंदोबस्त आणि विकेंड कर्फ्यूच्या भीतीने नागरिक बाजारपेठेत आले नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी पहायला मिळाली नाही.
शुक्रवारी गर्दी
शासनाने शनिवार-रविवार विकेंड कर्फ्यू घोषित केल्याने नागरिकांनी खरेदीसाठी शुक्रवारीच बाजारपेठेत गर्दी केली होती. विकेंड कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा दिली असली तरी बाजारपेठेत शनिवारी खरेदीदार, नागरिक दिसून आले नाहीत. किरकोळ भाजीपाला बाजारात काही बैठे विपेते आणि कांदे विपेते पहायला मिळाले. मात्र खरेदीदार नागरिकांनी पाठ फिरविल्याने विपेत्यांना दुकाने बंद करावी लागली.
उलाढाल थांबली
बाजारपेठेतील किराना दुकानदार, कपडे शोरूम आणि इतर दुकानांतून दररोज कोटय़वधींची उलाढाल होते. दर शनिवारी बाजाराचा दिवस असल्याने यात आणखी भर पडते. मात्र शनिवारी बाजाराच्या दिवशीच विकेंड कर्फ्यू जाहीर केल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. विशेषतः मोठी उलाढाल थांबली. त्यामुळे विपेते, व्यापारी, हमाल, रिक्षावाले, कष्टकरी, भाजीपाला विपेते यासह इतर विपेत्यांना देखील याचा फटका बसला.