ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी, दिग्दर्शक, चित्रकार अशी कलेच्या प्रांतात चौफेर मुशाफिरी करणारे रत्नाकर मतकरी यांनी सहा दशके मराठी रसिकांची मने घडवत मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. खऱया अर्थाने अबालवृद्ध मराठी रसिकांसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. नाटक, एकांकिका, बालनाटय़, कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख अशा सर्व प्रकारात त्यांनी दर्जेदार लेखन केले. रंगभूमीवर व्यावसायिक, प्रायोगिक आणि बालनाटय़ अशा तिन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नाटय़लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, त्यांचे संकल्पन, वेशभूषा, रेखाटन, अभिनय तसेच निर्मिती अशा प्रत्येक भूमिका निष्ठेने पार पाडल्या. आपल्या या सर्व प्रयोगात त्यांनी प्रेक्षकांनाही सामावून घेतले. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य, संस्कृती, नाटय़ आणि चित्रपटसृष्टीची न भरून येणारी हानी झाली आहे. संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी, भावे गौरव पदक यासह सर्वच्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कारांवर त्यांचे नाव कोरले आहे. इतके संपन्न कलाजीवन ते जगले की त्यांच्या नावानेच विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीचे पुरस्कार राज्य सरकारसह साहित्य, नाटय़ क्षेत्राला द्यावे लागतील. पु. ल. देशपांडे यांनी रत्नाकर मतकरी यांच्याविषयी म्हटले होते की, ‘40 वर्षात त्यांची नाटके पाहून मला आश्चर्य वाटले की, इतक्या वर्षात निर्मितीत कायम टवटवीतपणा ते राखू शकले. रंगभूमी ही पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नव्हे तर नाटय़ प्रसाराचे व्रत म्हणून त्यांनी निवडली. त्यांनी लेखन, दिग्दर्शन, निर्मितीत गाठलेला दर्जा अंगभूत कौशल्य आणि अथक निष्ठा दर्शविणारे आहे!’ महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाने दिलेले हे प्रशस्तीपत्र! वयाच्या 17 व्या वर्षी आकाशवाणीसाठी लिहिलेल्या पहिल्या एकांकिकेपासून अखेरपर्यंत त्यांच्या मनात विचार येत गेले आणि ते विविध प्रकारांमध्ये रसिकांसमोर ठेवत गेले. श्वासाबरोबरच आपल्या मनात विचार येतात असे मानणारे मतकरी खऱया अर्थाने ‘विचार रत्नाकर’ होते. मतकरी यांच्या विचार मंथनातून नाटकांपासून कथा, कादंबऱयांपर्यंत बरेच काही आगळे वेगळेच जन्माला येत गेले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना विजय तेंडुलकरांनी आपल्या वसुधा मासिकात रत्नाकर मतकरींची शर्वरी ही एकांकिका प्रसिद्ध केली आणि त्यांचा प्रवास गतिमान झाला. पदवी मिळेपर्यंत ते एक मान्यवर नाटककार बनले होते. इतक्या लहान वयात हे यश मिळाले कसे याचे आश्चर्य वाटायचे कारण नाही. शालेय वयात वाचनाची लागलेली गोडी त्यांना देवल, कोल्हटकर, गडकरींच्या नाटकांकडे घेऊन गेली. पुढे जगभरातील विचार प्रवाहही त्यांनी जाणून घेतले आणि त्यातून महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच विचारांचा जो अखंड सिलसिला सुरू झाला तो त्यांच्या शेवटापर्यंत सुरूच राहिला. 1959 साली सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी एकत्र आले आणि मराठीमध्ये बालरंगभूमीचे एक पर्वच सुरू झाले. त्यापूर्वी सांगलीत श्रीनिवास शिंदगी, मुंबईत शिरवळकर अशा मंडळींनी बालरंगभूमी समृद्ध केली होती. मात्र तीन तासांचे पूर्ण क्षमतेचे मधुमंजिरी हे नाटक रंगभूमीवर आले आणि या चळवळीला बळ मिळाले. तीन वर्षानंतर करमरकर आणि मतकरी यांच्या वाटा वेगळय़ा झाल्या त्या वास्तववादी नाटक आणि मतकरींचे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठीचे नाटक अशा दोन समांतर बाजूंनी. पुढे 25-30 वर्षे दोघांनीही बालरंगभूमीवर केलेले प्रयोग मराठीला समृद्ध करणारे ठरले. परी-राक्षसांच्या कथांपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढे फँटसी, ऐतिहासिक अशा विविध प्रकारांचे दर्शन घडवत राहिला. त्यांनी अनेक पिढय़ा समृद्ध केल्या. बालनाटय़ात आपण केलेले प्रयोग रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या गरजेपोटी ते निर्माता, दिग्दर्शकही बनले. एकांकिका, भयकथा, प्रायोगिक, व्यावसायिक चित्रमालिकांची निर्मिती, लेखन, दिग्दर्शनाचा हा चौफेर प्रवास सुरू होता. प्रेक्षक बदलत होता. पण, आश्चर्य म्हणजे रत्नाकर मतकरींच्या प्रयोगांना प्रत्येक काळातील प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. आपल्या नाटकाचे किमान शंभर प्रयोग तरी होणारच ही खात्रीच त्यांची हुकुमत दाखविणारी होती. त्यांचे विविध विषयांवरील लेख आणि संग्रह वाचल्यानंतर लक्षात येते की, मतकरी त्या त्या काळातही अद्ययावत होते. त्या त्या काळातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक समस्यांवर ते स्पष्ट मतांद्वारे दिशाही देत होते. आपल्याला केवळ विचार सुचतो नव्हे तर एखाद्या घटनेवर तोडगाही सुचतो. तो नाटक किंवा अन्य कोणत्या रूपात मांडता येईल तो दिसू लागतो आणि तसाच्या तसा आपण तो प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न करतो असे मतकरींचे त्यावर सांगणे होते, हे आश्चर्यकारक वाटेल. पण, मतकरींच्या विपुल लेखनाकडे आणि लोककथा 78, दुभंग, माझं काय चुकलं, खोल खोल पाणी, चार दिवस प्रेमाचे, वटवट सावित्री अशी विषयांचे वैविध्य असलेली नाटके, सामाजिक प्रश्न, नातेसंबंध, पौगंडावस्था, वृद्धांचे प्रश्न या विषयावरील लेखन पाहिल्यानंतर ते मान्यच करावे लागते. संपूर्ण आयुष्य रंगभूमीला वाहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाने 2012 साली ‘इन्व्हेस्टमेंट’ ही चित्रपटाची कथा लिहिली त्यासही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला! मध्यमवर्गाचा हपापलेपणा त्यापूर्वी नाटकातून त्यांनी मांडला होता, चित्रपटात तो अधिक गहिरा दिसला. कारण, तो बदलत्या काळाचा दिशादर्शक होता. हे सगळे करताना आपली सामाजिक बांधीलकी त्यांनी सोडली नाही. नर्मदा आंदोलनावरील 15 तैलचित्रे, झोपडपट्टीवासियांचा आवाज बनलेला वंचितांचा रंगमंच, गिरणी कामगार संघर्ष समितीतील सहभाग, एड्स आणि कुष्ठ रूग्णांसाठी त्यांनी नाटय़लेखन केले. 21 पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळालेल्या या व्यक्तीने तात्विक कारणांसाठी दोन पुरस्कार परतही केले होते. हे सगळे तेव्हाच घडते जेव्हा विचार पक्के असतात. सहा दशके हा ‘विचार रत्नाकर’ लाटा निर्माण करत राहिला. त्याच लाटा पुढेही प्रवाही राहोत हीच मतकरींना श्रद्धांजली.
Previous Articleदहावी परीक्षा 25 जून ते 4 जुलैपर्यंत
Next Article सध्याच्या घडीला विराटच सर्वोत्तम : इयान चॅपेल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.