गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया : तक्रार करूनही दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा पंपहाऊसपासून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला विजयनगर परिसरात गळती लागली आहे. याबाबत तक्रार करूनही दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे शहराच्या काही भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. तर दुसरीकडे जलवाहिनीला लागलेल्या गळतीद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. राकसकोप जलाशयाद्वारे हिंडलगा पंपहाऊसपर्यंत नैसर्गिकरित्या पाणीपुरवठा होतो. हिंडलगा पंपहाऊसमधून लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. तीन किलोमीटरचे अंतर असलेल्या जलवाहिनीच्या माध्यमातून चार विद्युत पंपांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या जलवाहिनीला विजयनगर परिसरातील मराठी शाळेसमोर गळती लागली आहे. या गळतीद्वारे पाणी वाया जात असून बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरून ते वाहत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱया वाहनधारकांनाही अडचणीचे बनले आहे.
शहरात विविध ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत शहराच्या विविध भागात गळतींद्वारे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीला लागलेली गळती लहान आहे. पण ती वेळीच काढली गेली नाही तर मोठय़ा प्रमाणात गळती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे सदर गळतीची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. पण दुरुस्तीकडे कंपनीच्या अधिकाऱयांचा कानाडोळा झाला आहे. सदर गळतीची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.