‘तोयबा’च्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात शुक्रवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यावेळी झालेल्या तुंबळ चकमकीत भारताचा एक जवान हुतात्मा झाला असून तो विजापूर जिल्हय़ातील बसवन बागेवाडी तालुक्यातील उक्कली येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुलवामा जिह्यातील राजपोरा भागात गुरुवारी रात्रीपासून ही चकमक सुरू होती. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये निशाझ लोन उर्फ खिताब या एका डिस्ट्रिक्ट कमांडरचा समावेश असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱयांकडून देण्यात आली.
पुलवामा जिल्हय़ातील रायपोरा भागात हंजीन गावामध्ये एका कमांडरसह काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला. त्यानंतर जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीदरम्यान दुपारपर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले होते. त्यानंतरही ही चकमक सुरू होती. अंतिमतः सायंकाळपर्यंत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी स्पष्ट केले. ही कारवाई म्हणजे सुरक्षा दलाचे ‘मोठे यश’ (बिग सक्सेस) असल्याचा दावाही त्यांनी केला. अजूनही काही दहशतवादी लपल्याची शंका सुरक्षा दलाला असल्याने सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले होते. तसेच सदर भागात गस्त आणि सुरक्षाही वाढविण्यात आली होती.
भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर
दहशतवाद्यांच्या कुरघोडय़ांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्करी पथकातील जवान काशी राय बोम्मनहळ्ळी यांनी शौर्य दाखवत दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात मोलाची भूमिका पार पाडली. पण अखेरीस या चकमकीत त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. चकमकीत अन्य एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला आहे. जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले.
अनंतनागमध्ये पोलिसांवर हल्ला
दुसरीकडे दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
विजापूरमधील मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव हवालदार काशी राय बोम्मनहळ्ळी (वय 44) असे आहे. त्यांचे पार्थिव 3 जुलै रोजी श्रीनगरहून रवाना होणार आहे. पार्थिव सर्वप्रथम बेळगावमधील सांबरा विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर विजापूर जिल्हय़ातील मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी सुनीलकुमार यांनी दिली. बेळगाव येथील लष्करी अधिकाऱयांकडून जिल्हाधिकाऱयांना याबाबत माहिती पुरविण्यात आली आहे.