विजापूर आगारातून महाराष्ट्रात बससेवा सुरू
विजापूर / प्रतिनिधी
विजापूर आगारातून बुधवारपासून महाराष्ट्रात बससेवेला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद शहरकाडे कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस धावल्या.
कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या पाच महिन्यापासून कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद होती. दरम्यान महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत होती. मात्र दोन्ही राज्यात कोरोना रुग्णांची वाढतच होती. त्यामुळे बससेवा लांबणीवर पडली होती. अखेर बुधवापासून विजापूर जिल्हय़ातून महाराष्ट्रात बससेवेला सुरुवात झाली.
त्यामुळे दोन्ही राज्यांच्या प्रवाशांना दिलासा मिळाला. विजापूर जिल्हय़ातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र कोरोनामुळे दोन्ही राज्यांची बससेवा साधारण पाच महिन्यापासून ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली होती. विजापूर आगारातून महाराष्टाच्या सोलापूर, नांदेड, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्हय़ासाठी बससेवा सुरू झाली असली तरी मुंबई, सांगली, कोल्हापूर, पुणे शहराची बससेवा बंदच आहे..