काम वेळेत पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा : नगरसेवकांच्या शिष्टमंडळाचा इशारा
प्रतिनिधी / विटा
विटा नगरपरीषद हद्दीत शिवाजीनगर ते नेवरी नाका आणि चिरवळ ओढा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हे दोन्ही रस्ते अपुर्ण महामार्गाच्या कामामुळे मृत्यूचे सापळे बनले आहेत. तसेच शहरातील स्वच्छता अभियानामध्येही या प्रलंबित कामामुळे अडथळे निर्माण होत आहेत. या रस्त्यामध्ये मोठे खड्डे असल्यामुळे लोकांना वाहने चालवताना खूप कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके याना दिल्याचे तारळेकर यांनी सांगितले.
प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये लक्ष घालून संबधीत ठेकेदाराकडून रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे. अन्यथा आम्हाला जनआंदोलन उभा करावे लागेल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, नगरसेवक सुभाष भिंगारदेवे, फिरोज तांबोळी, माजी सभापती अविनाश चोथे, ऍड. धर्मेश पाटील, संजय सपकाळ, भरत कांबळे, कुलदीप भिंगारदेवे उपस्थित होते.