दोन हजार रुपयांसाठी कामगारांवर कागदपत्रे जमवण्याची वेळ
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या विणकर कामगारांसाठी आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी विणकर सन्मान निधीची घोषणा केली आहे. या अंतर्गत विणकर कामगारांना 2 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत एकदाच देण्यात येणार असून या रकमेसाठी सध्या कामगारांकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. यामुळे आधिच लॉकडाऊनमुळे खचलेल्या विणकर कामगारांची परिस्थिती ‘भिक नको पण कुत्रे आवर’ याप्रमाणे झाली आहे. केवळ दोन हजाराची एकदाच मदत देऊन या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होत आहे. त्यातच या दोन हजारासाठी विणकर कामगारांवर किमान दोनशे ते तीनशे रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे.
आर्थिक मदत मिळविण्यासाठी विणकर कामगारांना संबंधित यंत्रमाग कारखानदारांकडून (काम करत असणाऱया ठिकाणी) माहिती (संमती) पत्र घ्यावे लागणार आहे. यामध्ये कामगारांची संपूर्ण माहिती नमुद करावी लागणार असून कामरगारांचे नाव, वय, जात, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक आदींची माहिती भरावी लागणार आहे. शिवाय आधारकार्ड, कामगाराचे संमती पत्र, यंत्रमागावर काम करत असतानाचा लाभार्थी कामगारांचा फोटो, संबंधित यंत्रमाग धारकांचे वीजमिटर आर.आर. क्रमांक, उद्योग आधार, पीएमटी-उद्योग परवाना पत्र, अशा विविध प्रकाराची माहिती आणि कागदपत्रे कामगार खात्याच्या अधिकाऱयांना द्यावी लागणार आहेत. या शिवाय कामगारांना वीस रुपयाचा बाँड पेपर आणण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यामुळे या सर्व कागदपत्रांची आणि माहितीची जुळवाजुळव करण्यात कामगारांचे श्रम आणि पैसा वाया जाणार आहे.
विणकर सन्मान निधी योजनेअंतर्गत कामगारांना दोन ऐवजी पाच हजाराची मदत करावी अशी मागणी होत आहे. मात्र याकडेही दुर्लक्ष झाले आहे. तर आता दोन हजार रुपये देण्यासाठी विणकर कामगारांकडून अशा प्रकारे माहिती आणि कागदपत्रे मागण्यात आली आहेत. यामध्ये यंत्रमागधारक कारखानदारांनाही आपल्या सर्व कामगारांच्या संमती पत्रावर माहिती भरून स्वाक्षरी करावी लागणार आहे. यामुळे कामगारांसह मालकांचीही डोकेदुखी वाढली आहे. यासाठी सरकारने अन्य कामगार वर्गाप्रमाणे विणकर कामगारांच्या बँक खात्यात थेट मदतीची रक्कम जमा करावी अशी मागणी मालकवर्गासह विणकर कामगांरांनी केली आहे.