रघु आचार यांच्या वक्तव्याने गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
विधानपरिषदमधील 25 सदस्य निवृत्त झाले आहेत. यावेळी निवृत्त होणाऱया काही सदस्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत सभागृहातील सदस्यांनी आणि सभापतींनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद मानले. मात्र विधानपरिषद सदस्य रघु आचार यांनी विधानपरिषदेमधील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे अनेक सदस्यांनी त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याबद्दल त्यांनी माफी मागावी, असा आग्रह धरला. त्यामुळे रघु आचार यांनी सभागृहाची माफी मागितली.
यावेळी विधानपरिषद सदस्य रघु आचार म्हणाले, मी दोनवेळा विधानपरिषद सदस्य झालो. मात्र सभागृहामध्ये आम्ही बोललो तरी आमचे ऐकणारे कोणी नाही. इथे बोलून काय फायदा? असा प्रश्न उपस्थित केला. 1 कोटी ते दीड कोटी रुपये आम्ही खर्च करून विधानपरिषदेत यायचे. मात्र येथे काहीच कामे होत नाहीत, अशी भावना व्यक्त केली. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. मात्र त्याला जोरदार विरोध रघु आचार यांनी केला. तुम्ही न खर्च करता विजयी झाला का? याची शपथ घ्या, असे म्हणून सभागृहाबद्दल नाराजी व्यक्त केली.
मात्र त्याला बहुसंख्य सदस्यांनी विरोध केला. तुम्ही निवृत्त होत आहात म्हणून अशाप्रकारे बोलू नका. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनीही तुम्ही दोनवेळा सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम केला आहात. निवृत्त होताना अशाप्रकारे वक्तव्य करणे योग्य नाही. आता या सभागृहाऐवजी विधानसभेमध्ये येणार असे सांगत आहात. मात्र विधानसभेबद्दलही तुम्ही असेच बोलणार काय? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. सभागृहाचा अवमान करू नका, हे योग्य नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अखेर माफी मागून सभागृहातून पडले बाहेर…
यावेळी काही सदस्यांनी रघु आचार यांच्याबद्दल आक्षेप घेतला. ते जे बोलले आहेत ते चुकीचे आहे. त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. सर्वच सभासदांनी विरोध केल्यामुळे तसेच चुकीचे बोलल्यामुळे अखेर रघु आचार यांनी माफी मागून सभागृहातून बाहेर पडण्यातच धन्यता मानली.