सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या ट्विटवरून सरकारवर टीका : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रमक पवित्रा
प्रतिनिधी / बेंगळूर
विधानसभेत मंगळवारी इंधन दरवाढीच्या मुद्दय़ावर जोरदार चर्चा झाली. राज्यसभा सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटचा विषयही यावेळी चर्चेला आला. यावेळी काँगेस आमदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. तर सत्ताधारी भाजप आमदारांनी ‘भारत माता की जय’ या घोषणेने सभागृह दणाणून सोडला.
विधानसभा कामकाजावेळी मंगळवारी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलेल्या ट्विटचा मुद्दा सभागृहात चर्चेला आला. त्यावेळी काँग्रेस सदस्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिली. तर सत्ताधारी आमदारांनी भारत माता की जय या घोषणेने सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. तेव्हा विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी ही घोषणाबाजी कशाला? असा प्रश्न उपस्थित करत पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे का, असे विचारले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला.
याचवेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी काँग्रेस नेते श्रीरामाच्या नावाचा जयघोष करीत असल्याने आपल्याला आनंद झाला आहे. तुमच्या तोंडून रामाचे नाव ऐकूण आपण खूष झालो आहे, अशा शब्दात काँग्रेस आमदारांचा चिमटा काढला.
त्यावेळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, माझ्या नावातही राम आहे. तुम्हाला राम दत्तक देण्यात आलेले नाहीत. श्रीराम आपले देखील आहेत, असे सांगितले. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी देणगी दिला का?, असा प्रश्न सिद्धरामय्यांना केला. त्यावर स्पष्टीकरण देताना सिद्धरामय्या यांनी आपण आपल्या गावातील राम मंदिरासाठी देणगी दिली आहे, अयोध्येतील राम मंदिरासाठी नाही, असे सांगितले.
तेव्हा भाजप आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी मध्येच हस्तक्षेप करत तुम्हाला शिव्या द्यायच्या असतील तर राज्य सरकारला द्या. हे सभागृह पंतप्रधान मोदी, केंद्र सरकारला शिव्या देण्यासाठी नाही. तुम्ही पंतप्रधानांच्या नावानेच ओरड करत आहात, असा टोला लगावला.
राज्यसभेतील भाजपचे सदस्य सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘श्रीरामाच्या भारतामध्ये पेट्रोल 93 रुपये आणि सितेच्या नेपाळमध्ये 51 रुपये तर रावणाच्या लंकेत पेट्रोल 53 रुपये लिटर आहे.’ असा उल्लेख ट्विटवर केला होता. याच मुद्दय़ावरून कर्नाटक विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये टोलवाटोलवी झाली.
सर्वसामान्यांविषयी सभागृहात चर्चा नको का?
पेट्रोल, डिझेल, गॅस, आहार उत्पादने व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने या विषयावर चर्चा करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी लक्षवेधी सूचना मांडून विधानसभेत नियम 60 अंतर्गत चर्चा सुरू केली. महागाईमुळे राज्यातील जनता होरपळली आहे. दर नियंत्रणात सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका केली. त्यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी आक्षेप घेत अर्थसंकल्पावर चर्चा करा, अशी विनंती केली. त्यावेळी सभाध्यक्ष कागेरी यांनी वेळेचा अपव्यय होत असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी सर्वसामान्यांविषयी सभागृहात चर्चा नको का?, आपल्या विधानांना बोम्माई यांनी घेतलेला आक्षेप योग्य नाही. हा जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप सिद्धरामय्यांनी बोम्माईंवर केला. त्यानंतरही बोलणे सुरूच ठेवून सिद्धरामय्या यांनी करवाढ आणि दरवाढीच्या आकडेवारीचा तपशिल मांडला.