प्रतिनिधी/ पणजी
राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांचे अधिवेशनातील अभिभाषण संपल्यानंतर ते विधानसभागृहाबाहेर निघताना काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो, अपक्ष आमदारांनी ‘गोव्यात कोळसा नको’ अशा घोषणा दिल्या आणि तशी मागणी करणारे काळे फलक, काळय़ा फितीसह राज्यपालांना दाखवले. कोळशाच्या विरोधात निषेध नोंदवला. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राज्यपालांच्या अभिभाषणात कोळशावर काहीच उत्तर नसल्याबद्दल आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली तर राज्यपालांना खास अधिवेशनासाठी पत्र पाठवले होते त्याचे साध्ये उत्तरही त्यांनी दिले नसल्याचे आमदार लुईझिन फालेरो यांनी निदर्शनास आणले.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सांगितले की पूर्ण दिवसांचे म्हणजे 21 दिवसांचे अधिवेशन घेण्याची मागणी आपण केली होती आणि कामकाज सल्लागार समितीलाही सांगितले होते तरी देखील आता केवळ 3 ते 4 दिवसांचे अधिवेशन घेण्यात येत आहे. मागील वर्षात केवळ 7 दिवसच अधिवेशन झाले. आता या 3/4 दिवसात गोव्यातील ज्वलंत विषय केव्हा, कसे मांडायचे? वेळच नाही असे श्री. कामत यांनी निदर्शनास आणले व त्यावर निवाडा देण्याची मागणी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे केली.
कोळसा बंद करण्याची मागणी
आमदार चर्चिल आलेमाव, विजय सरदेसाई यांनी कोळसा बंद करा, अशी मागणी केली तर मगोचे सुदिन ढवळीकर यांनी लक्षवेधी सूचनांचा प्रश्न उपस्थित करून आपल्या 14 पैकी एकही सूचना कामकाजात समाविष्ट नसल्याचे दाखवून दिले. सरकार हवे ते निर्णय घेत असून लोकशाहीची हत्या चालू असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. राज्यात 60 वा मुक्तिदिन साजरा करण्यात येत असला तरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारकडे उपाय नाहीत असेही ते म्हणाले. आमदार रोहन खंवटे यांनी अधिवेशनातील प्रश्नांसंदर्भात विचारणा केली.
शेवटी राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार मानणारा ठराव आमदार ग्लेन टिकलो यांनी मांडला आणि आमदार दयानंद सोपटे, सुभाष शिरोडकर यांनी त्यास अनुमोदन दिल्यानंतर सभापतींनी कामकाज तहकूब केले.