नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
आम्ही सांगू तेच ऐका, आम्ही सांगू तीच लोकशाही अशा धोरणानुसार केंद्र सरकारला संसदेत चर्चा हवी आहे. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारव केली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस प्रकरणात सुनावणी आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, आम्हाला खात्री आहे जे आम्हाला सगळ्यांना म्हणायचे आहे. तीच भूमिका सगळे प्रमुख पत्रकार आमच्या वतीने न्यायालयात मांडतील. आमची साधी मागणी आहे की, याबाबात चर्चा करावी. हेरगिरीच्या प्रकरणाबाबत देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे. जर सरकार पक्ष हा अधिकार नाकारत असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावे या देशातील लोकशाही आम्ही मोडून काढली आहे. असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही, महागाईवर बोलायला तयार नाही, हेरगिरीवर बोलायला तयार नाही. मग केंद्र सरकार कोणत्या विषयावर बोलायला तयार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चमचेगिरी करावी ही अपेक्षा असेल तर ते चालणार नाही. विरोधी पक्षाने सरकारने हातात घालून देशाचे काम करावं अशी आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचे आहे. विशेषता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर पेगॅसस हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सरकार सर्व मुद्द्यावर बोलायला तयार आहे. पण आम्ही सांगु तेच बोला आम्ही सांगू तेच ऐका आम्ही सांगू तीच लोकशाही अशा धोरणानुसार चर्चा करा अशी सरकारची भूमिका आहे. हा १२५ कोटीचा देश आहे. या देशाने स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अनेक लढाया लढल्या आहेत. ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर अशा प्रकारे हल्ले केले आहेत. ते राजकारणातून संपले आहेत हा देशाचा इतिहास असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.