राज्यसभेतून निलंबित खासदारांचे धरणे समाप्त, मात्र निलंबन रद्द होईपर्यंत कामकाजावर बहिष्काराचा विरोधकांचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कृषी विधेयकावरील चर्चेदरम्यान गोंधळ केल्याबद्दल राज्यसभेमधून निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित होऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सभात्याग केला. दरम्यान, निलंबित खासदारांनी संसद भवन परिसरात धरलेले धरणे समाप्त केले असले, तरी त्यांचे निलंबन रद्द होईपर्यंत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधकांकडून घेण्यात आला आहे.
काँग्रेसचे खासदार चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेतील निलंबित खासदारांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. ते म्हणाले की, हा मुद्दा कृषी विधेयकाशी संबंधित आहे. ते मागे घ्यावे अशी आमची इच्छा आहे. कृषिमंत्री नरेंद्र तोमर ते मागे घेण्यास राजी झाले, तर अधिवेशन सुरू ठेवण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. यावेळी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दुसऱया सभागृहात जे घडते त्यावर या सभागृहात कधीच चर्चा झालेली नाही, याकडे लक्ष वेधले.
काँग्रेसचे खायचे दात वेगळे : तोमर
यावेळी कृषिमंत्री तोमर यांनी काँग्रेसचे खायचे दात व दाखविण्याचे दात वेगळे असल्याची टीका केली. ते सभागृहात एक बोलतात आणि बाहेर जाऊन काही तरी वेगळेच सांगतात. विरोध करणारे शेतकरी नाहीत, ते काँग्रेसशी संबंधित आहेत हे देशाला माहीत आहे. काँग्रेसने आपल्या शासनकाळात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही. मोदी सरकारने त्यांच्या शिफारशी मान्य केल्या, असे ते म्हणाले. काँग्रेसची सुद्धा या सुधारणांची अंमलबजावणी व्हावी अशी इच्छा होती, परंतु दलालांच्या दबावामुळे ते तसे करू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा सभापतींची विरोधकांसमवेत बैठक
विरोधी पक्षांनी सभात्याग केल्यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी खासदारांसह बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध पक्षांतील खासदार उपस्थित होते. यावेळी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
धरणे समाप्त, बहिष्काराचा निर्णय
तत्पूर्वी, राज्यसभेतून निलंबित केलेल्या आठ खासदारांनी संसद संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळय़ासमोर धरलेले धरणे सोमवारी रात्रभर चालू राहिले. राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी रविवारी गदारोळ घातल्याबद्दल व उपसभापतींसोबत गैरवर्तन केल्याबद्दल या खासदारांना निलंबित केले होते. मंगळवारी हे धरणे समाप्त करण्यात आले, परंतु आठ सदस्यांचे निलंबन रद्द करेपर्यंत विरोधी पक्ष सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकेल, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
उपसभापती हरिवंश, शरद पवार यांचे उपोषण
दरम्यान, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी विरोधी खासदारांनी केलेल्या गदारोळाच्या विरोधाच्या निषेधार्थ 24 तास उपोषण करण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेत जे घडले त्यामुळे आपण गेल्या दोन दिवसांपासून दु:खी, तणावग्रस्त आणि मानसिक क्लेशात आहे. आपल्याला रात्रभर झोपही आली नाही. लोकशाहीच्या नावाखाली सभागृहातील सदस्यांकडून हिंसक वर्तन झाले, असे त्यांनी सभापतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही निलंबित खासदारांना आपले समर्थन व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपोषणाचा पवित्रा मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
चहापानाला विरोधी खासदारांचा इन्कार सोमवारी दुपारपासूनच धरणे धरून बसलेल्या खासदारांना भेटण्यास उपसभापती हरिवंश मंगळवारी सकाळी पोहोचले. या खासदारांसाठी त्यांनी चहा करून आणला होता. तथापि, विरोधी खासदारांनी चहा पिण्यास नकार दिला.