महाराष्ट्र राज्यातील 14 हजारावर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असून सायंकाळपर्यंत जाहीर झालेल्या चार हजारांवर निकालांपैकी एक हजार ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पाठोपाठ भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनीही अनुक्रमे यश मिळवले आहे. तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी म्हणून राज्यात एकत्र सत्ता राबवली असली तरी हे पक्ष ग्राम पंचायतीची निवडणूक मात्र एकत्र येऊन लढू शकले नाहीत. आपापल्या पॅनेलला आणि गावपातळीवरील कार्यकर्त्यांना मोकळीक देऊन त्यांनी निवडणुका लढवल्या तरी तीन पक्षांना मिळालेले यश लक्षात घेतले तर लोकांचा कल भाजपकडून महाविकास आघाडीकडे वळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये त्याची चुणूक दिसली होतीच. मात्र शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने भाजपला त्यांच्यावर टीका करणे आणि आपल्यापेक्षा शिवसेनेचे अपयश मोठे आहे म्हणण्याची संधी मिळाली होती. यावेळी ग्रामीण महाराष्ट्राने भाजपची ही वाटही अडवली आहे. तरीही भाजप नेत्यांनी आपणच राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचा दावा केला आहे. नेत्यांचे दावे हे सुरूच राहणार. विदर्भातल्या अनेक जिह्यात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर भाजपसाठी ती धोक्मयाची घंटा मानली पाहिजे. मात्र भाजपने सिंधुदुर्ग जिह्यात राणेंच्या वाढलेल्या वर्चस्वाकडे बोट दाखवले आहे. मात्र रत्नागिरी जिह्यात भाजपची झालेली स्थिती त्यांना नजरेआड करावी लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला आव्हान देणाऱया भाजपने काही ठिकाणी मिळवलेले यश राष्ट्रवादीलाही जमिनीवर आणणारे आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सासुरवाडीत त्यांचे मेहुणे आणि कुटुंबातील तीन लोक पराभूत झाले. त्याच घराण्यातील भाजपकडे असणाऱया दुसऱया पातीकडे सत्ता परावर्तित झाली. राज्यात अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या. सर्वात लक्षवेधक घटना म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या खानापूर गावात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अनोखी युती असताना शिवसेनेने तिथे दादांना अडीच अडीच वर्षे सरपंचपद वाटण्याचा प्रस्ताव दिला होता, जो ठोकरण्यात आला. मात्र तेथे शिवसेनेच्या आमदार आबिटकर गटाने जोराचा धक्का देत सत्ता संपादित केली. औरंगाबाद जिह्यात आमदार हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना धक्का देत पिशोर ग्रामपंचायतीने या दोघांना सोडून तिसऱया घटकाला विजयी केले. राहता तालुक्मयातील 25 पैकी 24 ग्रामपंचायत जिंकणाऱया राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांच्या स्वतःच्या लोणी खुर्द गावात सत्ता राखता आली नाही. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज म्हणून राज्यभर मान असणाऱया माजी मंत्री राम शिंदे यांना त्यांच्या चैंडी गावची सत्ता राखता आली नाही. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूजची सत्ता विजयसिंह मोहिते पाटलांनी राखली मात्र जनतेने त्यांच्या पुतण्याचाच येथे पराभव केला. मराठवाडय़ातल्या लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिह्यांवर काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्री कुटुंबांचा वर्चस्वाचा दावा असतो. मात्र तिथे भाजपने त्यांना चांगलेच झुंजवले. राज्यातील या ठळक निकालांचा विचार केला तर ग्रामीण जनतेने दाखवलेले शहाणपण सहज लक्षात येते. सत्ता कोणालाही दिली तरी विरोधाला संपवून टाकण्याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने केलेला नाही, हेच या निकालाने स्पष्ट झाले आहे. 1992 साली झालेल्या 73 व्या घटना दुरुस्तीमुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामपंचायतींकडे अधिक पैसा येऊ लागला. तीन निवडणुकांनंतर गावावर आपले वर्चस्व असलेच पाहिजे त्याशिवाय राजकारणात थारा नाही हे कार्यकर्त्यांना चांगलेच समजले आहे. नेत्यांना ते फार आधी समजले होते. त्यामुळेच गावागावात पतीविरुद्ध पत्नीचे पॅनेल भावा विरुद्ध भावाचे पॅनेल असा धुरळा महाराष्ट्राने अनुभवला. मात्र त्याचवेळी आदर्श गावाची संकल्पना राज्यभर सांगणाऱया मंडळींनाही या राजकारणाचा फटका बसला. 25 वर्षे औरंगाबाद जिह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखून आदर्श ग्रामपंचायत चालवणारे भास्करराव पेरे-पाटील यांना आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी स्वतःची उमेदवारी मागे घ्यावी लागली. आठ जागा बिनविरोध झाल्या मात्र तीन जागांवर निवडणूक लागली. त्यातील एका जागेवर पेरे पाटलांच्या कन्येचा पराभव झाला. या घटनेने महाराष्ट्र हळहळला तरी हा लोकांचा कौल आहे. त्यांना आता गावात पेरे पाटलांचे नेतृत्वच नको असे वाटत असल्यास ते स्वीकारणे भाग आहे. स्वतः भास्करराव निवडणूक होईपर्यंत या गावात आले नाहीत हा त्यांचा मोठेपणा. नाही तर अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गाजलेल्या सुरेश पठारे यांच्यावर मतदानासाठी साडय़ा वाटप केल्याचा आरोप झाला. वैशिष्टय़ म्हणजे अण्णा हजारे यांचे आशीर्वाद लाभलेले त्यांचे ग्रामविकास पॅनेल विजयी झाले आहे. त्यांनी निवडणुकीनंतर जल्लोष करत काढलेली मिरवणूक पोलिसांना रोखावी लागली. त्याचवेळी हिवरे बाजारमध्ये निवडणूक लागली तरी ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेललाच विजयी केले. या सर्व निकालातून महाराष्ट्रातील जनतेच्या विचारांचा कौल दिसून येतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक निवडणूक जिंकतोच म्हणणाऱया भाजपला त्यांनी रोखले. तीन पक्ष म्हणून आम्ही राज्यात सहज विजयी होऊ म्हणणाऱया पक्षांनाही त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्के दिले. त्यामुळेच गावात, जिह्यात राज्यात आणि देशात विरोधाची आणि विरोधक म्हणून उभे ठाकणाऱयांची किंमत राखणारा म्हणूनही या निकालाकडे पाहिले पाहिजे.
Previous Articleबिहारमध्ये दिवसभरात 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.