मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्ट आश्वासन
प्रतिनिधी/ पणजी
जनतेला नको असलेला कोणताही प्रकल्प राज्यात होऊ देणार नाही. आपले सरकार सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घेते. या सरकारला जनभावनांची कदर आहे. त्यामुळे असा कोणताही प्रकल्प लोकांवर लादला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.
राज्यात होऊ घातलेल्या विविध मोठय़ा प्रकल्पांना सध्या लोकांकडून होत असलेल्या कडव्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री त्यांच्या आल्तिनो निवासस्थानी बोलत होते. राज्यात सध्या आयआयटी, रेल्वे दुपदरीकरण, कोळसा, वीज निर्मिती, नावशी मरिना यासारखे प्रकल्प होऊ घातले असून त्या सर्वच्या सर्व प्रकल्पांना लोकांची जोरदार विरोध होत आहे. पुढील दीड वर्षभरात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास सदर प्रकल्प म्हणजे काही आमदारांच्या अस्तित्वावरच घाला ठरण्याची भीती असल्याने नमते घेण्यावाचून सरकारसमोर पर्याय राहिलेला नाही, असेच मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावरून दिसून येत आहे.
मेळावलीत आयआयटीला विरोध
वाळपईतील मेळावली येथे लाखो चौ. मी. जमिनीतील रान कापून होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी रान पेटवले असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी आंदोलने, धरणे, निषेध मोर्चा, अशा विविध मार्गांचा त्यांनी आतापर्यंत अवलंब केला आहे. अशा परिस्थितीत सरकारही हट्टालाच पेटले तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशाराही दिला आहे.
नावशीतील मरिना प्रकल्प रद्द करणार : मुख्यमंत्री
अशाच प्रकारचा विरोध नावशी येथील नियोजित मरिना प्रकल्पासाठीही होत असून या प्रकल्प आंदोलकांच्या विरोधासमोर नमते घेत सरकारने तो प्रकल्प रद्दच करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प त्यांच्यावर लादला जाणार नाही, या प्रकल्पाशी संबंधित दस्तावेज मागवून घेऊन तो रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तशी माहिती सांताक्रुझचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी ग्रामस्थांसह कुडकाöबांबोळी-तळावली पंचायत मंडळालाही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात भडकलेला विरोधाचा वणवा शमण्याच्या स्थितीत आहे.
नावशी मरिना प्रकल्पामुळे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण झाला होता. नुकत्याच शिरदोन पंचायतीजवळ झालेल्या आंदोलनात लोकांनी एकतर सदर प्रकल्प रद्द करावा किंवा सरकारमधून बाहेर पडावे यासाठी सिल्वेरा यांच्यावर जोरदार दबाव आणला होता. त्यासंबंधी सिल्वेरा यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर सर्व संबंधितांची बैठक घेण्यात येऊन अखेरीस सदर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. वर्ष 2010 पासून या मरिना प्रकल्पासाठी प्रयत्न होत होते. मात्र त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहावर गदा येईल तसेच पर्यावरणालाही मोठी हानी पोहोचेल, असे दावे करत लोकांनी जोरदार विरोध दर्शविला होता. आता मुख्यमंत्र्यांनी तो रद्दच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोळसा, रेल्वे प्रकल्पांच्या विरोधात आमदार आंदोलकांच्या बाजूने
दुसऱया बाजूने कोळसा प्रकल्प व रेल्वे दुपदरीकरणाला होणारा विरोध सरकारपक्षाचे घटक असलेले कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस यांची डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. त्यामुळे आता त्यांनी लोकांच्या बरोबर राहणे पसंत केले असून प्रसंगी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला तरी चालेल, मात्र दोन्ही प्रकल्प आपल्या मतदारसंघात होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
रेल्वे दुपदरीकरणाच्या मार्गातील चांदोर व दवर्ली येथे होऊ घातलेल्या क्रॉसिंगच्या कामावर आंदोलकांनी मोर्चा आणून सदर कामे बंद पाडण्यास रेल्वेवर दबाव आणला होता. सदर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार डायस यांनी चांदोर येथे भेट देऊन पाहणी केली, तसेच नंतर मुख्यमंत्र्यांना भेटून कोळसा वाहतुकीस आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले.
सदर प्रकल्पास विरोध होत असतानाही मध्यरात्रीच्या वेळेस सदर काम करण्यात येत होते. त्यामुळे आंदोलकांनी अनेक रात्री जागून रेल्वे मार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. लोकांचा विरोध पाहता आमदार डायस यांना आपल्या भूमिकेत बदल करणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळेच सदर प्रकल्पांच्या समर्थनार्थ आपण सरकारच्या बाजूने आहे असा गैरसमज करून घेऊ नये, असा खुलासाही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. चांदोर चर्चची जागा रेल्वे प्रकल्पासाठी वापरण्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना सदर प्रकरणी मुख्यमंत्री आणि रेल्वे अधिकाऱयांना नोट पाठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मोले येथे होऊ घातलेल्या वीज प्रकल्पालाही लोकांचा जोरदार विरोध होत असून या प्रकरणी स्थानिक तसेच पर्यावरणवाद्यांचे मन वळविण्याचे सरकारचे प्रयत्न चालले आहेत. मात्र त्यात किती यश येते आणि सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.