मान्यता/ प्रतिनिधी
बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने विविध कार्यक्रमांसाठी यापूर्वी जारी केलेल्या मार्गसूचींमध्ये बदल केला आहे. त्यामुळे विवाह, धार्मिक कार्यक्रमांमध्ये अधिक संख्येने लोकांना उपस्थित राहण्यावर निर्बंध आले आहेत. खुल्या जागेवरील विवाह समारंभासाठी 200 जणांच्या आणि बंदिस्त जागा, सभागृहातील विवाह समारंभांसाठी 100 पेक्षा कमी जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी हे प्रमाण अनुक्रमे 500 आणि 200 इतके होते.
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून धार्मिक कार्यक्रमांवर अनेक निर्बंध घातले आहे. विवाह समारंभांमध्ये उपस्थितीच्या मर्यादेत आणखी कपात केली आहे. तर दुसरीकडे वाढदिवस कार्यक्रमांसाठी बंदीस्त जागेतील कार्यक्रमात 25 आणि खुल्या जागेवरील वाढदिवस कार्यक्रमासाठी 50 पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
अंत्यविधीवेळी देखील 50 पेक्षा अधिक जणांनी उपस्थित राहू नये, असा सरकारने आदेशात उल्लेख केला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी ही मार्गसूची जारी केली आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोकांना एकत्रित येण्यावर निर्बंध घातले आहेत. इतर समारंभांमध्ये 50 पेक्षा अधिक जणांची उपस्थिती असू नये. खुल्या जागेवरील राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थितांची मर्यादा 200 पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सभागृह, कल्याण मंटप, चित्रपटगृहे व इतर ठिकाणी कार्यक्रमांसाठी लोक एकत्र येणाऱया ठिकाणी या मार्गसूचीचे उल्लंघन केल्यास राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायदा 2005 च्या सेक्शन 51 ते 60 आणि भा. दं. वि. अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.