वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या कोरोना महामारी समस्येमुळे आयसीसीच्या सुरू असलेल्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप क्रिकेट स्पर्धेच्या काही पात्र फेरीच्या वेळापत्रकात अडथळा आला असला तरी या स्पर्धेचा अंतिम सामना पुढील वर्षीच्या जून महिन्यात ठरल्याप्रमाणेच घेतला जाईल, अशी माहिती आयसीसीच्या नियंत्रण समितीने मंगळवारी वृत्तसंस्थेला दिली.
गेल्या जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगातील स्थिती चिंताजनक बनली आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडा हालचाली थांबविण्यात आल्या. आयसीसीच्या वार्षिक क्रिकेट वेळापत्रकावरही कोरोनाचा विपरित परिणाम झाल्याने अनेक कसोटी मालिका रद्द कराव्या लागल्या. दरम्यान विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील रद्द करण्यात आलेल्या सामन्यांना गुण देण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. येत्या काही दिवसामध्ये आयसीसीच्या नव्या गुण पद्धतीची माहिती प्रसिद्ध केली जाईल पण गुण पद्धतीला धक्का न लावता या स्पर्धेची अंतिम फेरी खेळविली जाईल, असे सांगण्यात आले. कोरोना महामारीमुळे ऑस्ट्रेलियात चालू वर्षी होणारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली.
आयसीसीतर्फे गेल्यावर्षी (2019साली) विश्व क्रिकेट कसोटी चाम्पियन्सशीप स्पर्धेला नव्याने प्रारंभ करण्यात आला होता. या स्पर्धेच्या रूपरेषेनुसार सुरूवातीला कसोटी मानांकनातील पहिल्या नऊ संघांमध्ये द्विपक्षीय कसोटी मालिका खेळण्याची तरतूद करण्यात आली होती. सदर स्पर्धेतील सहा कसोटी मालिका दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करून आघाडीच्या दोन संघामध्ये या स्पर्धेतील अंतिम सामना लंडनच्या लॉर्डस् मैदानावर खेळविण्याचे जाहीर केले होते. पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या गुणतक्त्यात सध्या भारत आघाडीवर असून ऑस्ट्रेलिया दुसऱया स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेतील आतापर्यंत चार मालिका खेळल्या असून ऑस्ट्रेलियाने तीन मालिका खेळल्या आहेत. इंग्लंडने चार मालिका खेळल्या असून यामध्ये मायदेशातील विंडीज आणि पाक विरूद्धच्या जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या मालिकांचा समावेश आहे. इंग्लंड तिसऱया स्थानावर आहे.