भारताचा निचांकी धावसंख्येत खुर्दा झाल्याने विस्मयचकित व नाराज झालेल्या माजी खेळाडूंनी तसेच चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. भारताच्या बलाढय़ फलंदाजी फळीची नेहमीच चर्चा केली जाते. पण या डावात कमिन्स-हॅझलवुडसमोर त्यांचा अक्षरशः फडशा पडल्याचे दिसून आले. भारतीय फलंदाजांनी ज्या धावा जमविल्यात त्यावरून ‘विसरावा असा ओटीपी म्हणजे 49204084041’ असे ट्विट माजी स्फोटक सलामीवीर सेहवागने केले आहे. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
पहिल्या डावात भारताने फलंदाजी-गोलंदाजीत वर्चस्व गाजविले. पण ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात जबरदस्त प्रदर्शन करीत भारताला ‘आऊटक्लास’ केले, अशी प्रतिक्रिया सेहवागचा आदर्श सचिन तेंडुलकरने व्यक्त करताना ऑस्ट्रेलियाचे अभिनंदनही केले आहे.
भारतीय फलंदाजांना दोष देणे योग्य ठरणार नाही. कारण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीच शानदार प्रदर्शन केले असल्याचे माजी महान फलंदाज सुनील गावसकर एका वाहिनीशी बोलताना म्हणाले.
बचावात्मक खेळण्याचे कौशल्य सुधारण्याची गरज असल्याचे मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले तर ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज शेन वॉर्न यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी निव्वळ अप्रतिम आणि अविश्वसनीय कामगिरी केल्याचे म्हटले आहे. ‘या मालिकेत भारताचा एकतर्फी पाडाव होणार, असे मी याआधीच म्हटलो होतो,’ असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने म्हटले आहे.