गावकर समाजाकडून तीव्र आक्षेप : गुरव समाजाकडून आनंद व्यक्त.पोलीस बंदोबस्तात पारंपरिक तुळशी विवाह
प्रतिनिधी /वाळपई
वेळूस रवळनाथ देवस्थानाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दसरोत्सवा दिवशी सत्तरीच्या मामलेदारांनी देवस्थानच्या दरवाजाला लावलेले कुलूप सुनावणीतील आदेशानुसार उघडण्यात आले. याला गावकर समाजाने तीव्र आक्षेप घेऊन पूर्वसूचना न देता मामलेदारानी हा दरवाजा उघडल्यामुळे गावकर समाजातील मंडळी आक्रमक झाली. यामुळे देवस्थानच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याचवेळी पोलीस बंदोबस्तात देवस्थानच्या तुळशीचा पारंपरिक सोहळा संपन्न करण्यात आला. दरम्यान देवस्थानचा दरवाजा उघडल्यामुळे गुरव समाजाने आनंद व्यक्त केला आहे.
मामलेदारांचा आदेश व अंमलबजावणी
दरम्यान, देवस्थानाचे गावकर व गुरव या समाजा दरम्यान निर्माण झालेले मतभेद या पार्श्वभूमीवर दसरोत्सवादिनी कायदा व सुव्यवस्था याचा सारासार विचार करून तत्कालीन मामलेदार दशरथ गावस यांनी देवस्थानाच्या दरवाजाला कुलूप लावले होते. यासंदर्भात खटला मामलेदाराच्या न्यायालयात सुरू होता. यावर सुनावणी देताना दशरथ गावस यांनी देवस्थानच्या दरवाजाचे कुलूप उघडण्याचा निर्णय दिला होता व दरवाजाचे कुलूप देवाची पारंपरिक पूजा-अर्चा करणाऱया समाजाकडे सुपूर्द करण्यात यावेत असे स्पष्ट केले होते.
दरम्यान, मामलेदार दशरथ गावस यांची बदली तिसवाडी याठिकाणी झाली तर नवीन मामलेदार कौशिक देसाई यांनी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदारपदाचा ताबा स्वीकारला. दशरथ गावस यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने आठ दिवसांपूर्वी प्रयत्न करण्यात आले होते .मात्र गावकर समाजाने याला तीव्र आक्षेप घेतला व सदर भागातील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
काल शुक्रवारी सकाळी मात्र अचानकपणे मामलेदार कौशिक देसाई, संयुक्त मामलेदार साईश नाईक, तलाठी तुळशीदास मांदेकर आदी अधिकारी मंडळी पोलीस बंदोबस्तातसह सकाळी 10 वा. सुमारास घटनास्थळी हजर झाली व रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देवस्थानाच्या दरवाजाचे कुलूप उघडले.यावेळी सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या गुरव समाजाने देवाची पूजा केली.
सुगावा लागताच गावकर समाजमंडळी घटनास्थळी दाखल
दरम्यान, या संदर्भात सुगावा लागताच गावकर समाजाची मोठय़ा प्रमाणात मंडळी घटनास्थळी दाखल झाली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी मामलेदार कौशिक देसाई व साईश नाईक यांना अक्षरश धारेवर धरले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून त्यांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. देवस्थानचा दरवाजा उघडण्यापूर्वी यासंदर्भाची पूर्वसूचना गावकर समाजाला देण्याची गरज होती . मात्र याबाबत गुप्तता का पाळली, असा सवाल यावेळी गावकर समाजाने केला. मात्र याला प्रत्युत्तर देताना कौशिक देसाई म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे हे सरकारी यंत्रणेचे काम आहे व ते पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र यावर गावकर समाजाने असमाधान व्यक्त केले व आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी केला.
अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुळशी विवाह
दरम्यान, देवस्थानाच्या प्रमुख दरवाजावर गावकर समाज व मामलेदार यंत्रणेची चर्चा सुरू असतानाच याचाच फायदा घेत गुरव समाजाने पोलीस बंदोबस्तात देवस्थानचा पारंपरिक तुळशी विवाह हा कार्यक्रम आटोपून घेतला. अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुळशी विवाह संपन्न झाला .जोपर्यंत देवस्थानाच्या तुळशी विवाहाचे प्रक्रिया पूर्ण करता येत नाही तोपर्यंत गुरव समाजातील मंडळीच्या घरासमोर असलेल्या तुळशीसमोर विवाह प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. यामुळे घाई गडबडीत देवस्थानच्या तुळशी समोरील विवाह पार पाडण्यात आला अशी माहिती उपलब्ध झाली.
देवस्थानच्या चाव्या गुरव समाजकाकडे सुपूर्द
दरम्यान, देवस्थानाचा दरवाजा उघडून देवाची पूजा करण्यात आली. तुळशी विवाह संपन्न झाला. त्यानंतर पुन्हा एकदा देवस्थानचा दरवाजा बंद करून या संदर्भाच्या चाव्या गुरव समाजाकडे प्रदान करण्यात आलेल्या आहेत. यामुळे गावकर समाजाने तीव्र संताप व्यक्त केला असून सरकारी यंत्रणा गावकर समाजाच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मात्र सरकारी यंत्रणेला आपण कधीही माफ करणार नाही, असा इशारा देण्यात आलेला आहे .सरकारच्या यंत्रणेने गावांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण केलेली आहे .यामुळे यदाकदाचित गावांमध्ये भांडण-तंटे झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी मामलेदार यंत्रणेची रहणार असल्याचा इशारा गावकर समाजाने दिला आहे.
आता दैनंदिन पूजेला सुरुवात होणार
दरम्यान, यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गुरव समाजाने सांगितले की, देवस्थानचा दरवाजा उघडावा यासंदर्भात गेल्या तीन दिवसांपासून प्रतीक्षा करण्यात येत होती. शेवटी ही प्रतीक्षा संपुष्टात आलेली आहे. रवळनाथ देवस्थानाचा दरवाजा उघडला. यामुळे 34 दिवसानंतर देवाचे दर्शन झालेले आहे. यामुळे आम्ही आनंदी झालेलो आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. देवस्थानच्या तुळशीजवळ पारंपरिक विवाह प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे होते ती पूर्ण झालेली आहे. यामुळे आता दैनंदिन पूजेला सुरुवात होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.