बाजारपेठेतील चित्र : जनतेतून कोरोना नियमांचे उल्लंघन सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
बाजारात गर्दी होऊ नये व कोरोनाचा संसर्ग टाळावा, याकरिता सरकारने नवीन मार्गसूची जारी केली आहे. सोमवारपासून किराणा दुकाने व एपीएमसीला दोन तास वाढीव मुभा देण्यात आली आहे. शिवाय भाजीपाला व फळांची विक्री हातगाडीवरून करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सकाळी 6 ते 10 या वेळेत सुरू राहणाऱया बाजारपेठेच्या वेळेत बदल करण्यात आला असून सकाळी 6 ते 12 पर्यंत बाजारपेठ खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी वेळ वाढवून दिली असली तरी बाजारपेठेत गर्दी कायम दिसून येत आहे.
क्लोजडाऊनच्या सहाव्या दिवशाही बाजारपेठेत तोबा गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, विनाकारण फिरणाऱयांवर आळा घालण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी गेल्या मंगळवारपासून क्लोजडाऊनचा नियम जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 6 ते 10 पर्यंत वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, खरेदी-विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याने सरकारने वेळ वाढवून दिली आहे. तरीही गर्दी दिसून येत असल्याने कोरोनाच्या नियमाचा फज्जा उडताना दिसत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी किराणा दुकाने व एपीएमसी सकाळी 6 ते 12 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सोमवारी बाजारपेठेत किराणा दुकाने 12 पर्यंत सुरू असलेली पाहायला मिळाली.
शिवाय खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली. दरम्यान, 12 नंतर पेट्रोल पंप व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे.
दरम्यान, दुधाविना नागरिकांचे हाल होऊ नयेत, याकरिता दूध विक्रीची दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.