चिपळूण व्यापऱयांनी उघडली होती सकाळी दुकाने
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्याचे लॉकडाऊन आम्हाला परवडणारे नाही असे म्हणत सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा जिल्हय़ातील व्यापाऱयांनी प्रशासनाला दिला होता. आम्ही बाजारपेठ उघडणार अशी भूमिका व्यापाऱयांनी घेतली होती. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी व्यापाऱयांनी सकाळच्या वेळी आपापली दुकाने उघडली होती. मात्र प्रशासनाने या सर्व व्यापाऱयांना समज देत दुकाने बंद करायला भाग पाडले. त्यामुळे व्यापाऱयांचे बंड प्रशासनाच्या डोसने थंड झाल्याचे दिसून आले.
रत्नागिरी तालुक्यातील व्यापाऱयांनी मंत्री उदय सामंत, तसेच माजी खासदार व भाजपाचे नेते नीलेश राणे यांची भेट घेऊन बंद विरोधात आपले म्हणणे त्यांच्याकडे मांडले होते, तसेच चिपळूणातील व्यापारी संघाने आमदार शेखर निकम यांची भेट घेऊन दुकाने उघडी ठेवण्याबाबतची चर्चा केली. चिपळूण व्यापारी महासंघाने सोमवारपासून सर्व दुकाने उघडण्याचा इशारा तालुका व्यापारी महासंघाने निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱयांना दिला होता. याबाबत प्रशासनाने हे निवेदन शासनाकडे पाठवले आहे. यावर निर्णय शासनच घेऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे व्यापाऱयांनी नियम मोडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले होते मात्र तुम्ही काहीही निर्णय घ्या, आम्ही बाजारपेठ उघडणार अशी भूमिका व्यापाऱयांनी घेतली होती. मात्र प्रशासनाने सर्व व्यापऱयांना समज देऊन दुकाने बंद करावयास लावली.
रत्नागिरी शहरातील काही व्यापाऱयांनी दुकानाची एक फळी उघडी ठेऊन व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संबंधित व्यापारी व प्रशासकीय अधिकाऱयांमध्ये खडाजंगी झाली मात्र प्रशासकीय अधिकाऱयांनी या व्यापाऱयांना सज्जड देम देताच दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आली. दुपारनंतर रत्नागिरी शहरातील रामआळी बाजारपेठत रस्त्यावर बॅरिकेट लावून वाहनांसाठी बंद ठेवण्यात आली होती.
खेड बाजारपेठेत विकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी गर्दी उसळली. मात्र, अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर आस्थापना बंदच राहिल्याने साऱयांचा हिरमोड झाला. लॉकडाऊनच्या निषेधार्थ काही व्यापाऱयांनी दुकानांवर लावलेले निषेधांचे फलक कायम होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कडकडीत लॉकडाऊन झाल्यास बाहेरही पडता येणार नसल्याची शक्यता गृहित धरून राजापुरात सोमवारी खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होते. तांदुळ, गहूसहीत कडधान्य खरेदीवर मोठा भर तर काही नागरीकांकडून शीतपेय, भाजीपाल्याची मोठी खरेदी दिसून आली.
विकेंन्ड लॉकडाऊनला दापोलीकरांनी प्रतिसाद दिल्यानंतर सोमवारी मात्र मोठय़ा प्रमाणात खरेदीसाठी गर्दी करण्यात आली. गर्दी होताच प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे चित्र पहायला मिळत हेते. मात्र ही गर्दी पुन्हा होणाऱया लॉकडाऊनच्या भितीने असल्याचे समोर आले.
संगमेश्वर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी बाजारपेठेत जाणारा मार्ग एक मार्गी करीत व दुकाने बंद करण्यास सांगत गर्दी कमी केली.