आटपाट नगर होतं. सगळय़ा जगात आली तशी आटपाट नगरातही कोरोनाची साथ आली होती. अशा वेळी आपल्या भक्तांची दु:खे समजून घेण्यासाठी आणि आवश्यक असेल तिथे त्यांना मदत करण्यासाठी शंकर आणि पार्वती अदृश्य विमानातून संचार करीत होते. त्यांनी काहींना शाप दिले, काहींना उःशाप दिले, चांगल्या भक्तांना आशीर्वाद आणि वरदान दिले. हे करीत असताना अनेक ठिकाणी पार्वती हसत होती किंवा हसू दाबत होती. कैलास पर्वतावर पोचल्यानंतर भगवान शंकरांनी पार्वतीला हसण्याचे कारण विचारले.
“हा मानवप्राणी मोठा चमत्कारिक आहे. आनंदाच्या प्रसंगी तर सोडाच, दु:खाच्या किंवा संकटाच्या प्रसंगी देखील तो विनोदबुद्धी सोडत नाही.’’“ब्रह्मदेवानंच ते केलंय ना. सर्व सजीवांमध्ये सर्वाधिक विनोदबुद्धी, थट्टामस्करीची कला आणि हसण्याचे वरदान फक्त मानवालाच आहे. वाकुल्या दाखवून चिडवणारी माकडं, वानरं आणि काही प्राणी वगळता कोणाकडंच ते नाही. पण तुला हे का आठवलं?’’
“फार पूर्वी एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलं होतं… भवानी आई रोडगा वाहीन तुला.’’
“हो, हो, आज त्याची का आठवण झाली?’’
“आठवण मला नाही, माझ्या एका भक्ताला आली. त्यानं नवीन भारूड रचायचा प्रयत्न केलाय…
सत्वर पाव गं मला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
नगरसेवक तोंड लपवितो, लॉकडाऊनात गायब होतो
व्होट मागतोय गं मला जरा कोविड दे गं त्याला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
पुढारी म्हणतो, जत्रेत जा, वारीत जा, देवळात जा
गर्दीत जा, चिथावतोय मला, क्वारंटीन कर त्याला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
आयुर्वेदाच्या नावाखाली, योगासनांच्या नावाखाली
बोगस औषध देतो मला, करोना होऊ दे त्याला
भवानी आई रोडगा वाहीन तुला
भगवान यावर मनापासून हसले. त्यांनी विचारलं, “मग? भक्तांच्या या मागण्या मान्य करणार की काय?’’
“अलबत, खोटं बोलणाऱयांना आणि समाजाला फसवणाऱयांना पॉझीटीव्ह होण्याची शिक्षा दिलीय मी. त्यातून बरे झाल्यावर त्यांची वृत्ती सुधारेल अशी अपेक्षा आहे,’’ मातेने उत्तर दिले. “पण समाजाने फसू नये आणि या चोरांच्या नादी लागू नये म्हणूनही काही करायला हवं.’’ “आपला गणपती सर्वांना सुबुद्धी देतोय. त्यांनी ती स्वीकारायला हवी आणि डोळसपणे वागायला हवं.’’