प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या अंमलबजावणीत सर्व व्यवहारांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे शनिवारच्या आठवडी बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्यापासून गरजेच्या वस्तू खरेदीसाठी सकाळी 9 पासूनच बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून आली. बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे दिसून आले.
भाजीपाल्यापासून, फळे, कडधान्य, तिखटाची मिरची-मसाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाल्याचे दिसून आले. महागाईचा आलेख चढता असला तरी वस्तूंची गरज ओळखत ग्राहकांकडून खरेदी केली जात होती. यामुळे अनेक दिवसापासून थंडावलेले कांदा मार्केट खरेदीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसून आले.
भाजीपाल्याचे दर
रविवारी सर्व व्यवहार बंद असल्याने प्रामुख्याने भाजी बाजारात गर्दी दिसून आली. कांदे, बटाटेपासून पालेभाज्यांच्या खरेदीसाठी कांदा मार्केट परिसरात ग्राहकांची गर्दी होती. कांदा, लसून, बटाटे, आले यांच्या दरात मागील आठवडय़ाच्या तुलनेत वाढ झालेली नाही. बाजारात कोबी, वांगी, गवारी तसेच फ्लॉवर या भाज्यांची आवक अधिक असून त्या तुलनेत पालेभाज्या कमी असल्याने पालेभाज्यांचा दर चढा आहे. कोथिंबिरीचा भाव वाढला असून 30 ते 40 रु. जुडी दराने त्यांची विक्री केली जात आहे.
रस्त्यावरील बाजार बहरला
आठवडी बाजारात रस्त्यांच्या दोहोबाजूंनी शोभेच्या वस्तू, कपडे तसेच जीवनावश्यक इतर साहित्य, स्टेशनरी, प्लास्टिक, काचेच्या वस्तूंची दुकाने थाटल्याचे दिसून आले. परराज्यातील नागरिकांकडून प्रामुख्याने या साहित्यांची विक्री केली जाते. नियमांच्या शिथिलतेमुळे या बाजाराला देखील मुभा मिळाली असून गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड या भागात सदर विक्रेते दिसून आले.
आपली सुरक्षितता आपल्या हातात
बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे ग्राहक व विक्री करणारे विक्रेते यांनी आपली सुरक्षितता आपल्या हातात याची जाणीव राखत मास्कचा अवलंब केल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, ग्राहकांची गर्दी यामुळे बाजारपेठेत सामाजिक अंतर राखणे शक्य होत नसल्याचे चित्र दिसून आले. मात्र विक्रेत्यांकडून दोरी तसेच चौकटी आखत अंतर ठेवूनच खेरदी करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याचे दिसून आले.
शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारपर्यंत बाजारपेठ बंद
कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी संपूर्ण संचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शनिवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ व व्यवहार बंद राहणार आहेत. या आवाहनानुसार आवश्यक साहित्य खरेदीसाठी शनिवारचा बाजार 100 टक्के फुल्ल झाल्याचे दिसून आले.