श्रीकृष्णाला शरण आलेला माहेश्वर ज्वर पुढे म्हणाला-
ऐसिया तूंतें न जाणून । करूं आलों तुजसी कदन ।
मनुष्यबुद्धि तुज भावून । सामर्थ्य पूर्ण प्रकटिलें ।
माझें नाम रौद्रज्वर । जगत्रयातें संतापकर ।
करितां तव देहीं संचार । पावलों दुस्तर संताप ।
तुझें ऐश्वर्य इत्थंभूत । आतां झालें प्रतीतिगत ।
म्हणोनि आलों शरणागत । रक्षीं अंकित स्वामिया ।
रौद्रज्वर शरणागत । होवोनि कृष्णातें विनवीत ।
त्याची विनंति इत्थंभूत । सावध समस्त अवधारा।
रौद्रज्वर श्रीकृष्णाला वंदन करून पुढे म्हणाला – आपण लीलेनेच अनेक रूपे धारण करून देव, साधू व लोकमर्यादांचे पालन करता. त्याचबरोबर उन्मत्त आणि हिंसक अशा असुरांचा संहारही करता. आपला हा अवतार पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी झाला आहे.
तुझिया तेजें करूनि तप्त । झालों म्हणोनि शरणागत । पातलों मी तवाङ्कित । रक्षीं निवान्त निज शरण ।तुझें तेज नारायणा । दु:खें साहों न शके कोणा । तेणें तापलों करुणाघना । रक्षीं शरण्या शरणातें।माझ्या तेजें न तपती कोणी । तूं कां करिसी एव्हडी ग्लानि । तरी ऐकावें चक्रपाणि । माझी करणी मज बाधी ।तूं सच्चिदानंदघन । जैसा सुरद्रुम सुखसंपन्न । फळे कामितयाचे इच्छेकरून। नाहीं दूषण त्या आंगीं ।कामितां कल्याणेच्छा करी । तो त्या फळे तैसिया परी । अनिष्ट इच्छा ज्या अंतरिं । फळे निर्धारिं त्या तैसा ।तेंवि तवाङ्गीं नसे ताप । परंतु म्यां दीधला संताप ।
त्याचें फळही तदनुरूप । यथासंकल्प पावलों ।
त्वां जो सृजिला वैष्णवज्वर । तेंचि तव तेज साचार। अग्री शान्त पश्चात् क्रूर । शीतज्वर ज्या म्हणती ।तेणें तापलों बहुसाळ । प्राण होताती व्याकुळ । तुजवीण नसे निर्भय स्थळ । रक्षीं कृपाळशिरोमणे ।म्हणसी परसंतापक जे होती। संताप देणें त्यां तदुचिती । हेंही यथार्थ जी श्रीपति । परि सेवकांप्रति अनुचित ।ज्म्ववरी तुझें चरणारविंद। न सेवितां प्राणिवृंद । आशापाशीं झाले बद्ध । संतापखेद तंववरी त्यां ।मी स्वामीच्या चरणकमळा। शरण आलों श्रीगोपाळा। कृपापाङ्गें वर्षोनि जळा। तापा वेगळा मज रक्षीं।ऐशा रौद्रज्वराच्या उक्ति । ऐकूनि कृपाळू कमलापति। काय बोलिला तयाप्रति । तें तूं कुरुपति अवधारिं।
रौद्रज्वर पुढे म्हणाला – हे प्रभो ! आपल्या शांत, उग्र आणि अत्यंत भयानक, दु:सह अशा तेजस्वी ज्वरामुळे मी अत्यंत तप्त होऊ लागलो आहे. भगवन ! देहधारी जीव जोपर्यंत आशेच्या फासात अडकून आपल्या चरणकमलांना शरण येत नाही, तोपर्यंत त्याचे ठिकाणी ताप राहातोच. हे नारायणा आपले तेज सहन करण्याचे सामर्थ्य माझ्यासारख्या दुबळय़ापाशी कोठून असणार? मला हा ताप आता सहन होत नाही. हे गोपाळा! मी आपल्या चरणापाशी विनम्रपणे शरण आलो आहे. हा ताप दूर करून आपणच माझे रक्षण करावे.
Ad.देवदत्त परुळेकर