ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यासाठी केंद्र सरकारने भरीव निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे केली आहे.
पवारांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशातील साखर उद्योग लॉकडाऊनच्या आधीपासूनच आर्थिक संकटात आहे. या उद्योगाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी साखर निर्यात, बफर स्टॉक, किमान हमीभाव यासारख्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, कोरोनामुळे साखर उद्योगावरील आर्थिक संकट अधिक गडद झाले असून, त्याला उभारीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
साखर महासंघ आणि शरद पवार यांनी साखर उद्योगाला वाचविण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. सन 2018-19, 2019-20 पासून प्रलंबित असलेले सर्व निर्यात प्रोत्साहन भत्ते आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी तरतूद करावी. साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत 3450 रुपयांपासून 3750 पर्यंत गुणवत्तेनुसार वाढ करावी. दोन वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 600 रुपये अनुदान द्यावे. खेळत्या भांडवलाच्या थकबाकीचे अल्पमुदतीच्या कर्जात रूपांतर करावे. साखर कारखान्याअंतर्गत येणारे प्रक्रिया उद्योग वेगळे समजून त्यांना स्वतंत्र उद्योगाचा दर्जा द्यावा. तसेच त्यांना स्वतंत्र कर्ज उपलब्ध करून घ्यावे, अशा योजना पवार यांनी पत्रात नमूद केल्या आहेत.