प्रतिनिधी/बेळगाव
सध्या शहरवासियांना लॉकडाऊन आणि उन्हाचे चटके लागत असताना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विविध भागात अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना अशुद्ध पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या समस्येकडे पाणी पुरवठा मंडळ लक्ष देईल का अशी विचारणा होत आहे.
यंदा राकसकोप जलाशयाची पाणी पातळी चांगली असल्याने शहरवासियांना मे महिन्यात देखील तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पण ठिकठिकाणी करण्यात आलेल्या खोदाईमुळे जलवाहिन्यांना गळती लागण्याचे प्रकार वाढले आहेत. गळत्यांची दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. काही ठिकाणी व्हॉल्वच्या माध्यमातून दुषित पाणी मिसळते. काही ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या खराब झाल्याने गळती लागलेल्या जल वाहिनीतून ड्रेनेजचे सांडपाणी मिसळते. अशा विविध कारणांमुळे नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसापासून चव्हाट गल्ली, खडक गल्ली, मुजावर गल्ली आणि वडगाव शहापूर परिसरात लालसर पाणी पुरवठा होत आहे. दुषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे याबाबत तक्रार केली असता उद्धट उत्तर दिले जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी पाहणी करून चौकशी करावी तसेच गळतीद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्यास जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी. आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.