बेळगाव / प्रतिनिधी
बलाकमाला उडता भासे
कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती
ग्रहगोलचि की एकमते।।
या बालकवींच्या कवितेची आठवण शांताई वृद्धाश्रमात असलेल्या प्रत्येक मराठी व्यक्तीला आल्याशिवाय राहणार नाही. कारण दरवषीप्रमाणे यावषीही हिवाळय़ात स्थलांतरित पाहुण्यांचे म्हणजेच बगळय़ांचे आगमन येथे झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून बगळय़ांनी येथे वास्तव्य केले आहे.
हिवाळा सुरू होताच नद्या, सरोवर, समुद्र, तलाव यांचे पात्र पाणथळी हिवाळी पक्ष्यांनी भरून जाते. शहरात उद्याने, ग्रामीण भागात शेतीमध्ये या पक्ष्यांचा थवा दाखल होतो.
सध्या बेळगावात हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. शांताई वृद्धाश्रमाचा परिसर हा निसर्गाच्या सान्निध्यात असल्यामुळे येथे बगळे विहरताना दिसतात. सायंकाळी साडेपाचपासून सकाळी साडेसहापर्यंत त्यांचा सहवास आश्रमातील प्रत्येकाला मिळतो. गेल्या चार वर्षांपासून पक्ष्यांचा हा नित्यक्रम ते अनुभवत आहेत.
रात्रीच्या अंधारात उंच झाडावर हे पांढरे शुभ्र बगळे बघण्याचा नजराणा वेगळाच असतो. ज्याप्रमाणे बर्फाच्छादित प्रदेशात झाडावर हिमवृष्टी होते, त्याच प्रकारचे दृश्य या ठिकाणी पहावयास मिळते. हे पक्षी दरवषी आपली प्रेमापोटी विचारपूस करावयास येतात की काय, असा प्रश्न काही वृद्धांच्या मनात नक्कीच उमटत असेल. तर काहींना
बगळय़ांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात ।। हे भावगीत आठवून आपल्या तरुणपणाच्या आठवणी जाग्या होत असतील.
सायंकाळी सहाच्या दरम्यान चहाचा घोट घेत असताना पक्ष्यांचे आगमन होते. ज्याप्रमाणे एखाद्या विमानतळावर विमान उतरत असताना जे दृश्य असते, त्याच प्रकारचे दृश्य हे पक्षी उतरताना पाहायला मिळते. त्यामुळे वृद्धांना एक वेगळाच आनंद मिळतो. तसेच पहाटे उठल्यावर या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊन या आल्हाददायी वातावरणामुळे मनाला आनंद होत आहे.
तीन महिन्यांसाठी असते वास्तव्य : विजय मोरे
कार्याध्यक्ष, शांताई वृद्धाश्रम
हिवाळय़ात स्थलांतरित पक्षी याठिकाणी येतात. येथे त्यांचे वास्तव्य तीन महिन्यांसाठी असते. तीन महिन्यानंतर ते येथून निघून जातात. व पुढच्या वषी पुन्हा या ठिकाणी येतात. दरवषी या पक्ष्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी पक्षी आले आहेत. जवळपास पक्ष्यांची संख्या पंधराशे ते दोन हजाराच्या आसपास आहे. शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरात एक सकारात्मक ऊर्जा असल्याने हे पक्षी येथे येत आहेत असे वाटते. गेल्या महिन्याभरापासून हे पक्षी इथे दररोज येत आहेत. याबद्दल पक्षी मित्रांकडून माहिती घेतली असता यांना ज्या ठिकाणी सुरक्षित आसरा मिळतो त्या ठिकाणी ते जातात, असे विजय मोरे यांनी सांगितले.
2. मनाला वेगळाच आनंद मिळतो : नागेश चौगुले
ऑक्टोबर महिन्यापासून हे स्थलांतरित पक्षी या ठिकाणी येत आहेत. शांताई वृद्धाश्रमाच्या परिसरातील वृक्षावर बसलेले हे पक्षी पाहताना कवी मन जागे होते आणि मनाला वेगळाच आनंद मिळतो. दरवषी हे पक्षी या ठिकाणी येत असल्यामुळे कधी हिवाळा येतो याची आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो.