डेनेजची समस्या बनली रहिवाशांची डोकेदुखी : स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा चव्हाटय़ावर
प्रतिनिधी / बेळगाव
शास्त्राrनगर भागात डेनेजची समस्या येथील रहिवाशांची डोकेदुखी बनली आहे. समस्यांचे निवारण करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने डेनेजची समस्या जैसे थे आहे. शास्त्राrनगर तिसरा क्रॉस, चौथा क्रॉस आणि पाचवा क्रॉस परिसरातील डेनेज वाहिन्या तुंबल्याने समस्या निर्माण झाली आहे. नुकतेच करण्यात आलेले पेव्हर्सचे रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत.
शास्त्रीनगर भागात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण काही समस्या कायमस्वरुपी वर्षानुवर्षे तशाच आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पेव्हर्स रस्ते करण्यात येत आहेत. सदर रस्ते काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. मुख्य रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. पण आडव्या रस्त्यांवर पेव्हर्स घालण्यात आले नसल्याने सदर रस्ते ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे या रस्त्यांचा विकास कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
विद्युत वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यावरील काढले पेव्हर्स
पेक्हर्सचे रस्ते करून स्मार्ट रस्ते बनविण्याचा आटापिटा शासनाने चालविला आहे. पण करण्यात आलेले रस्ते ठिकठिकाणी उखडले आहेत. त्यामुळे हे रस्ते किती दिवस टिकणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. न्यू गुड्सशेड रोड रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. मात्र, विद्युत वाहिन्या घालण्यासाठी रस्त्यावरील पेव्हर्स काढण्यात आले. त्या ठिकाणी पुन्हा पेव्हर्स बसविले नसल्याने ठिकठिकाणी चरी निर्माण झाल्या आहेत. येथील रस्ताही खचला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा चव्हाटय़ावर आला आहे.
विहिरी-कूपनलिकातील पाणी बनले दूषित…
शास्त्रीनगरातील डेनेज वाहिन्या खराब होण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. डेनेज वाहिन्या तुंबून सांडपाणी विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पाझरत असल्याने पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्या वाहिन्यांना डेनेजची जोडणी करण्यात आली नाही. परिणामी जुन्या वाहिन्यांद्वारेच सांडपाण्याचा निचरा होत आहे. जुन्या वाहिन्या तुंबल्या असल्याने शास्त्रीनगर पहिला ते पाचव्या क्रॉसपर्यंतच्या डेनेज वाहिन्या तुंबून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याचप्रमाणे परिसरातील गटारींची स्वच्छता केली जात नसल्याने कचरा आणि मातीने भरल्या आहेत. त्याकडेदेखील मनपाचे दुर्लक्ष झाले आहे. सदर समस्यांचे निवारण करण्याची मागणी होत आहे.