खराब रस्त्यामुळे सर्वांची गैरसोय : रस्त्याला वालीच नसल्याचा ग्रामस्थांचा समज
वार्ताहर /सांबरा
शिंदोळी क्रॉस ते बसरीकट्टी रस्ता ठिकठिकाणी खचला असून रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनचालकांना दररोज कसरत करावी लागत आहे. तरी संबंधितांनी तातडीने रस्ता करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बसरीकट्टी हे गाव पूर्व भागातील महत्त्वाचे गाव आहे. बसरीकट्टी व शिंदोळी येथून दररोज बेळगावला कामानिमित्त व शिक्षणासाठी येणाऱया नागरिकांची व विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, खराब रस्त्यामुळे सर्वांची गैरसोय होत आहे. खराब रस्त्यामुळे अनेक वेळा वाहने नादुरुस्त होत आहेत. अशाने विद्यार्थी व नागरिकांना कामावर वेळेवर पोहोचणे कठीण होऊन बसले आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. बऱयाच ठिकाणी रस्ता खचल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे. खचलेल्या रस्त्याचा रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने अनेक वेळा लहान-मोठे अपघातही घडत आहेत. ग्रामस्थांनी अनेक वेळा रस्ता करून देण्याची मागणी करूनदेखील याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांची गैरसोय
मी दररोज बसरीकट्टी-बेळगाव या मार्गावर प्रवासी वाहतूक करतो. मात्र, रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक वेळा वाहतुकीत अडथळे येतात व बेळगावला वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनेही नादुरुस्त होऊन फटका बसत आहे. यासाठी संबंधित खात्याने तातडीने हा रस्ता करावा, अशी मागणी रिक्षाचालक पिराजी हिरोजी यांनी बोलताना केली.
खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताची शक्यता
आम्ही या रस्त्यावरून नियमित कामानिमित्त ये-जा करत असतो. मात्र, रस्ता खराब झाल्याने अनेक वेळा वाहनचालक खड्डे चुकवण्याच्या नादात वाहने कशीही चालवतात. अशाने अपघात होण्याची संभव वाढला आहे. रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांना खड्डय़ांचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडत आहेत. त्यामुळे तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची गरज बसरीकट्टी येथील मल्लाप्पा शेरेकर यांनी व्यक्त केली.
काही ठिकाणी रस्ता खचल्याने धोका
बऱयाच वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न केल्याने दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी रस्ता पूर्ण खचल्याने धोका निर्माण झाला आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्त्याचे काम करून नागरिकांना रस्ता सुयोग्य बनवावा, असे मत परशुराम पाटील व्यक्त केले.