प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्य़ातील शाळांचे ऑनलाईन शैक्षणिकवर्गांचे काम सध्या सुरू आहे. पण शाळांचे ऑफलाईन वर्ग कधी सुरू होणार, या बाबत अजूनही शासनस्तरावरून ठोस निर्णय झालेला नाही. पण जर शाळा सुरू झाल्यास त्याची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील 10,318 एकूण शिक्षकांपैकी 9,270 शिक्षकांना दोन डोस देण्याची कार्यवाही पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
शासनाकडून प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांच्या लसीकरणाची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी राज्यांना 5 सप्टेंबरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शिक्षक दिन साजरा करण्यापूर्वी देशातील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. ही लाट ओसरल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु होणार आहेत. गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे नियोजन बहुतांश राज्यांमध्ये होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी अगोदर शिक्षकांचं लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. शिक्षकांचे लसीकरण अग्रक्रमाने करण्याच्या सूचना देतानाच राज्यांना लसींचा अतिरिक्त पुरवठा करणार असल्याचेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षकदिनापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठीच या अतिरिक्त डोसचा वापर करण्याच्या सूचनाही राज्य सरकारना करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ाचा विचार करता आतापर्यंत 10 हजार 318 शिक्षकांची संख्या असून त्यापैकी 9,270 शिक्षकांचे दोन डोसचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 5,483 तर खासगी शाळांच्या 3,787 शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.