संपर्क दौऱयात मुख्यमंत्र्यांची घोषणा, शिरोडय़ात मार्केट संकुलाचे भूमिपूजन
प्रतिनिधी/ शिरोडा
शिरोडा मतदारसंघात येत्या मार्चपर्यंत दीडशे कोटींच्या विकासकामांची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी संपर्क दौऱयात केली. या संपर्क दौऱयाअंतर्गत त्यांनी शिरोडा, बोरी, बेतोडा निरंकाल व पंचवाडी या चारही ग्रामपंचायतीना भेटी देऊन काही विकासकामांची पायाभरणी व जनतेशी संवाद साधला. शिरोडा पंचायत क्षेत्रात मुख्यमंत्र्यांचे मोठय़ा जल्लोषात स्वागत झाले, तर बोरी पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाला नागरिक सोडाच, पण भाजपा कार्यकर्तेही उपस्थित न राहिल्याने या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
वाळपे शिरोडा येथील कदंब बसस्थानक परिसरात रु. 12 कोटींच्या बहुउद्देशीय मार्केट संकुलाची पायाभरणी करण्यात आली. पेडे शिरोडा येथे श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहाचे उद्घाटन व सुशोभीकरणाच्या कामाला मुख्यमंत्र्यांहस्ते प्रारंभ करण्यात आला. बेतोडा येथे 300 एमएलडी जलवाहिनीच्या कामालाही सकाळच्या सत्रात प्रारंभ करण्यात आला. बायथाखोल बोरी येथून स्थानिक आमदार सुभाष शिरोडकर व स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांतर्फे वाहन रॅलीसह मुख्यमंत्र्यांचे जय्यत स्वागत करण्यात आले. नवदुर्गा मंदिरात देवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी संपर्क दौऱयाला सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत शिरोडा मतदारसंघाचे प्रभारी व माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार सुभाष शिरोडकर, बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक बोरकर, शिरोडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिरोडा येथे 12 कोटींच्या मार्केट संकुलाचे भूमिपूजन
थळ शिरोडा येथे श्री कामाक्षी मंदिरात देवीचे दर्शन घेतल्यानंतर पेडे शिरोडा येथे उभारण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराच्या सभागृहाचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. मंदिर परिसराचे सुशोभीकरण तसेच संरक्षकभिंतीच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला. त्यांनतर वाळपे शिरोडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात अंदाजे रु. 12 कोटी खर्चून उभारण्यात येणाऱया मार्केट संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे उभारण्यात येणाऱया या प्रकल्पात शिरोडा पंचायतघरासह 40 दुकाने, व्यायाम शाळा अशा विविध सुविधा असतील. सरपंच अमित शिरोडकर यांनी भूमिपूजन सोहळय़ाचे यजमानपद भूषविले. त्यानंतर बाजार शिरोडा येथील सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. महिलांकडून आरत्या ओवाळून व पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे मोठय़ा जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिरोडा पंचायत क्षेत्रातील विविध महिला स्वयंसाहाय्य गटांकडून भरविण्यात आलेल्या चतुर्थी बाजाराचे उद्घाटन तसेच दिव्यांग मुलांसाठी असलेल्या दिव्याश्रय या शाळेला यावेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते रितसर परवानगी पत्र देण्यात आले. दुपारच्या सत्रात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते बेतोडा येथे 300 एम एम जलवाहिनीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी पंचवाडी येथील जितोणीमाठ या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शिलान्यास व दिगास येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या बालोद्यानाचे उद्घाटन करण्यात आले.
शिरोडय़ात धामधूम, बोरीत मात्र सामसूम
शिरोडय़ातील या मुख्य कार्यक्रमानंतर बोरी येथील श्री साईबाबा मंदिराच्या आवारात जनतेशी थेट संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुपारी 1 वा. नियोजित केलेल्या या कार्यक्रमस्थळी एकही नागरिक फिरकला नाही. भाजपाचे समर्थक असलेले स्थानिक पंच तसेच कार्यकर्त्यांनीही त्याकडे पाठ फिरवून एकप्रकारे बहिष्कारच टाकला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन संपर्क दौऱयाचे पुढील मार्गक्रमण करावे लागले. साईबाबा मंदिराच्या आवारात नियोजित संरक्षकभिंतीच्या पायाभरणीचा कार्यक्रमही रद्द करण्यात आला. बोरी पंचायत क्षेत्रात जनतेशी संवाद साधण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्यासाठी साईबाबा मंदिराच्या सभागृहात साधारण 250 खुर्च्याही मांडण्यात आल्या होत्या. मात्र लोकांनीच त्याकडे पाठ फिरवल्याने येथील समस्या व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद होऊ शकला नाही. सकाळी शिरोडय़ात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जी धामधूम पाहायला मिळाली, या उलट बोरीतील वातावरण मात्र चक्क सामसूम होते.
स्वयंपूर्ण आणि विकासाची दशसूत्री
शिरोडय़ातील मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्वयंपूर्णतेवर भर दिला. वीज व पाण्यासह, आरोग्य, शिक्षक व अन्य पायाभूत सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी भाजपा सरकार बांधील असल्याचे सांगितले. सर्वांसाठी आरोग्य, निवास, स्वच्छता, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा ही सरकारची दशसूत्रीचा असल्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केलेल्या 10 हजार नोकऱयांपैकी 6 हजार नोकऱयांच्या जाहिराती निघाल्या असून उर्वरित 4 हजार नोकऱयांची भरतीप्रक्रिया लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तिजोरी भरलेली असताना विकासकामे का केली नाहीत !
काँग्रेस पक्षावर टीका करताना ते म्हणाले, सन् 2007 ते 2012 या काळात दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस सरकार होते. राज्याची तिजोरी पूर्ण भरलेली असतानाही काँग्रेसने एकही जनकल्याणकारी योजना व पायाभूत विकासाच्या योजना राबविली नाही. आज विरोधात असलेले हेच लोक भाजपा सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करीत आहेत. मगो नेते सुदिन ढवळीकर हे मोफत पाणी योजनेचे श्रेय स्वतः लाटू पाहत होते. ते तब्बल वीस वर्षे बांधकाममंत्री होते. पण लोकांच्या पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. आज ते मोफत पाणी योजनेची थट्टा उडवीत आहेत. मात्र गोरगरीबांसाठी महिन्याकाठी 16 हजार लिटर पाणी हे खूप महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आम आदमी पक्षाची मोफत वीज ही निव्वळ निवडणूकपूर्व घोषणा आहे. यापूर्वी भाजप सरकारने राज्यातील वीज ग्राहकांना रु. 120 कोटींची सवलत तर त्यापूर्वी रु. 80 कोटींची सवलत देऊन कोरोना काळात वीज बिलांवरील भार कमी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एकाच दिवसांत 35 कोटींची विकासकामे मार्गी ः शिरोडकर
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील उच्च शिक्षणामध्ये प्रवेश शुल्कात कपात व काही अभ्यासक्रमांचे शुल्क माफ करुन विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा दिलेला आहे. गोव्यातील प्रत्येक गाव व प्रत्येक माणूस स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे, असे आमदार सुभाष शिरोडकर म्हणाले. शिरोडा मतदारसंघात एकाच दिवसांत 35 कोटींची विकासकामे मार्गी लागल्याची माहिती त्यांनी दिली. नरेंद्र सावईकर यांनी गोव्यात खरा विकास भाजपा सरकारच्याच कार्यकाळात पाहायला मिळाल्याचे सांगून पुन्हा एकदा राज्यात भाजपा सरकारला संधी देण्याचे आवाहन केले.