सातारा येथील अंतिम फेरीत पटकावला व्दितीय क्रमांक
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील अवघ्या 12 वर्षांच्या आदित्य लिमयेने गायलेल्या कडकडीत पोवाडय़ाने सारा आसमंत शिवमय झाला आणि प्रेक्षागृहातील साऱयानी आदित्यला टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. साताऱयात पार पडलेल्या शिवगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीच्या आदित्यने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
भाजपच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशतर्फे राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेत आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील 40 विभागांमध्ये पार पडली. दक्षिण रत्नागिरी विभागातून आदित्यने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्याची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी साताऱयातील शिवरायांची राजधानी असलेल्या अजिंक्यतारा गडावर होणार होती. मात्र पावसामुळे ही स्पर्धा डीसीसी हॉलमध्ये पार पडली.
अंतिम फेरीसाठी विविध विभागांमधून अनेक दिग्गज कलाकार, शाहीर आले होते. या तगडय़ा आव्हानाला न डगमगता आदित्यने दमदार सादरीकरण केले आणि द्वितीय क्रमांकासह 31 हजाराचा धनादेश व शिवगान सन्मानचिन्ह पटकावले. सातारा येथील सचिन शेवडे (सिंथेसायझर), सौ. अक्षता शेवडे (ऑक्टोपड) व सुजित गायकवाड (ढोलकी) यांनी तितकीच समर्थ संगीतसाथ केली.
‘कुटुंब रंगलंय काव्यात’फेम विसुभाऊ बापट आणि सारेगामफेम अभिजित कोसंबी यांनी परीक्षण केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप आदींच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
स्पर्धेत वयोगटाचे बंधन नसल्याने अंतिम फेरीत तगडे आव्हान होते. स्पर्धक म्हणून अनेक व्यावसायिक शाहीर सहभागी झाले होते. त्यात रत्नागिरीतील स्थानिक वादक साथीदारांच्या व्यावसायिक अडचणींमुळे स्थानिक वादक घेऊन अत्यंत कमी सरावात आदित्यने गीत सादर केले. मात्र गुरू सौ. विनया परब यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आणि श्री लक्ष्मीकेशवाच्या आशीर्वादाने आदित्यने आत्मविश्वासाने पोवाडा सादर केला आणि यश मिळवले, असे आदित्यचे बाबा आनंद लिमये यांनी आवर्जून नमूद केले.