नऊ उमेदवार जाहीर
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीय राजकारणाला लागलेली ’आलेमाव गेलेमाव’ संस्कृतीची कीड नष्ट करा व नव्या दमाच्या सामान्यातील सामान्य उमेदवारांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे उमेदवारांची घोषणा करण्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर लोकसभा खासदार अरविंद सावंत, उपसचिव सूरज चव्हाण, मुंबईचे आमदार सुनिल शिंदे, नाशिकचे आमदार सुहास कांदे, गोवा राज्यप्रमुख जितेश कामत, संपर्क प्रमुख जीवन कामत, युवा सेना सरचिटणीस अमोल शिरसीकर, भाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.
राज्य विधानसभेसाठी येत्या 14 फेब्रुवारी रोजी होणाऱया निवडणुकीसाठी श्री. राऊत यांनी नऊ उमेदवारांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने राज्यातील बलाढय़ मतदारसंघ असलेल्या पणजीतून लढवय्यै युवा नेतृत्व शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात श्री. वेलिंगकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्री. राऊत यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले व नंतर त्यांची पणजीसाठी उमेदवारी तसेच गोवा राज्य उपप्रमुखपदी निवडही जाहीर केली.
पुढे बोलताना श्री. राऊत यांनी, गेल्या काही वर्षांपासून गोव्याचे राजकारण हे पाच ते दहा प्रस्थापित राजकारण्यांच्या मुठीमध्ये आहे, त्यात धनदांडगे, भूमाफिया, राजकीय घराणी यांचा समावेश आहे, असा दावा केला. एवढय़ा भ्रष्ट पद्धतीने गोव्यात निवडणुका लढल्या जातात. त्यामुळे सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतेही स्थान राहिलेले नाही. भरीस अनेक राजकीय पक्ष निवडणुकीत उतरल्यामुळे गोव्याच्या जनतेसाठी काही आशादायी असे वातावरण दिसत नाही, असे ते म्हणाले.
हिंदी प्रदेशात ’आयाराम-गयाराम’ राजकारण चालते. गोव्यात आता ’आलेमाव गेलेमाव’ संस्कृती निर्माण होऊ लागली आहे. ही संस्कृती वेळीच मोडून काढायची असेल तर या प्रस्थापितांना घरी बसवावे लागेल. त्याच विचारातून शिवसेनेने जनतेतील सामान्यातील सामान्य व्यक्तीस उमेदवारी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. आज जाहीर करण्यात आलेले सर्व उमेदवार हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य कुटुंबातील आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेने यापूर्वी पणजीत उत्पल पर्रीकर यांनी पाठिंबा जाहीर केला होता, आणि आता उमेदवार कसा काय उतरवला? असे विचारता, पर्रीकर यांना आजही आमचा पाठिंबा आहे. मात्र ते उमेदवारी दाखल करतील की नाही याबद्दल साशंकता असल्यामुळे आम्ही आमचा उमेदवार उतरवला आहे. पर्रीकर जर खरोखरच लढणार असतील तर आमचा उमेदवार निवडणुकीतून माघार घेऊन त्यांना पाठिंबा देईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.