प्रतिनिधी / कोल्हापूर
आयोध्येतील रामजन्मभूमी मुक्त व्हावी यासाठी 60 वर्षे संघर्ष झाला. ही भूमी मुक्त होण्यासाठी आपला मोठा वाटा असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. सुरुवातीस संजय राऊत सांगत होते की, या कार्यक्रमाचे निमंत्रण येईल अथवा नाही. आपण जाणारच. आता रितसर निमंत्रण दिले आहे. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी पंचाईत झाली आहे. आयोध्येला जायचे असेल तर सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे काय म्हणणे आहे ? हे विचारात घ्यावे लागणार आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत आगामी काळात निवडणूक लढवायची असेल तर राष्ट्रवादीची मुस्लिम व्होटबँक शिवसेनेला मिळाली पाहीजे. राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेलाही अल्पसंख्यांकांचे लांगूनचालन करायला हवे. परिणामी आयोध्याला जायचे की नाही ? असा शिवसेनेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यासाठी हिंदूत्वापेक्षा खुर्ची महत्वाची असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.
कोल्हापूरातील निवास्थानी झालेल्या पत्रकार बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले, आता देशातल्या आणि जगातल्या सर्वसामान्य हिंदूसाठी ‘अब राम मंदिर होगा’ असा रोमांचक क्षण आला आहे. हा कार्यक्रम 3 कोटी लोकांच्या उपस्थितीत साजरा होणार नाही. 300 निवडक लोकांच्या उपस्थितीत पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहयोगी पक्षांचे मत विचारात घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच आयोध्येला जायचे की नाही हे त्यांना ठरवावे लागणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
क्षीरसागर यांनी स्वतःच्या स्थितीबाबत आत्मचिंतन करावे
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी एखादा आंबा पडल्याप्रमाणे मोठे झालेल्यांना पायदळी येण्यासाठी वेळ लागणार नाही असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सोमवारी सीपीआर येथील बेड वाटप प्रसंगी केला होता. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, क्षीरसागर यांनी आपली अशी स्थिती का झाली याचा विचार करावा, आत्मचिंतन करावे. मगच दुसऱयांवर आरोप करावा.
प्रकाश आंबेडकारांच्या सल्ल्याचे स्वागत करतो
बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करावे, अन्यथा विश्यपना करावी असे वक्तव्य केले होते. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत.त्यांचा मी आदर करतो. पण ज्यांना आपण जवळचे मानतो, तेच सल्ला देतात. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याचे आम्ही स्वागत करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.