प्रतिनिधी / कोल्हापूर
दोन वर्षे शहर प्रमुख म्हणून कार्य करत असताना पक्षाच्या नावाला बट्टा लागेल असे कोणतेही काम केले नाही, पदाचा गैरवापर केला नाही. आता मला शहर प्रमुखपदावरून जरी दूर केले असले तरी शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे रविकिरण इंगवले यांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्ष नेतृत्वाने गुरूवारी इंगवले यांना कोल्हापूर उत्तरच्या शहर प्रमुखपदावरून दूर करत त्यांच्या जागी जयवंत हारूगले यांची नियुक्ती केली. अचानक झालेल्या या बदलामुळे शिवसेनेसह राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती. इंगवले यांनीही प्रतिक्रिया दिली नव्हती. शुक्रवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिरच्या सांस्कृतिक हॉलमध्ये इंगवले यांच्या कार्यकर्ते, समर्थकांची बैठक झाली. या बैठकीत मौन सोडत इंगवले यांनी आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले, मी लंबी रेस का घोडा आहे, हे जाणवल्याने महाविकास आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने षडयंत्र केले. राजकारण करून माझे पंख कापण्याचे काम केले. पण मी डगमगणारा नाही. शिवसेनेशी एकनिष्ठ राहत सामाजिक कार्य पुढे सुरू ठेवणार आहे.
इंगवले म्हणाले, वीस वर्षांत शहर प्रमुखांनी जे कार्य केले, ते मी दोन वर्षांत केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार झाले पाहिजेत या मतावर मी कायम ठाम आहे. क्षीरसागरच भविष्यात मला पक्षशेष्ठींकडून बढती देवून न्याय मिळवून देतील, असेही इंगवले म्हणाले.
बैठकीला मोहन साळोखे, सागर साळोखे, सचिन चौगले, सुहास सोरटे, सचिन मांगले, रहीम बागवान, सचिन कारंडे यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन शहर प्रमुखांना टोला
दीडहजार कार्यकर्ते घेऊन बाहेर पडणारा शहरप्रमुख आणि टुव्हिलरवर बसण्यासाठी एकाही माणूस मिळत नाही, असा शहर प्रमुख हे लवकरच जनतेच्या समोर येईल, असा टोलाही इंगवले यांनी नूतन शहर प्रमुखांचे नाव न घेता लगावला.