कणबर्गी ः
गेल्या चार दिवसांपासून होणाऱया मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरासह उपनगर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचून त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. सततच्या होणाऱया पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्रवाशांचीही मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. अनेकांना गेल्या वेळच्या महापुराची आठवण होऊन जीव मुठीत घेऊन भीतीच्या सावटाखाली वेळ घालवावी लागत आहे. पावसाने थोडीही उसंत न घेता धुवाधार झोडपल्याने पूर्व भागात पाणीच पाणी झाले आहे.
कणबर्गी बसस्थानक मुख्य मार्गाला तलावाचे स्वरुप
बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गावात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. बसस्थानक असलेल्या मुख्य मार्गावर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने येथून ये-जा करणे जिकिरीचे बनले आहे. या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पाणी साचून राहिल्याने वाहनधारक व वयोवृद्ध पादचाऱयांची तारांबळ उडाली आहे. गावात जाण्यासाठी हा मुख्य मार्ग असल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे.
कणबर्गी येथे घरात शिरले पाणी
कणबर्गी येथील महात्माजी गल्ली, पाटील गल्ली, मठ गल्ली, गोकाक रोड आदिसहीत विविध ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांची भंबेरी उडाली असून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
कणबर्गी, मुचंडी, अष्टे आदी भागातील शेतीकामे संथगतीने
धुवाधार सुरू असलेल्या पावसामुळे पूर्व भागात सर्वत्र पाणी झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे संथगतीने सुरू आहेत. सध्या शेतवडीत रोप लागवडीची कामे सुरू आहेत. मात्र, शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्याने रोप लागवडीसाठी अडचण निर्माण होत आहे. लावलेली रोपे पुन्हा पाण्यावर तरंगत आहेत. त्यामुळे शेतीची कामे अगदी कूर्मगतीने सुरू आहेत.
कणबर्गी सिद्धेश्वर देवस्थान डोंगरावर झऱयाला सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. मात्र, बुधवारी पावसाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर डोंगरावरून पाण्याच्या झऱयाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मंदिराला येणारे भाविक या झऱयाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
नागरिकांनी केल्या गटारी स्वच्छ
गेल्या दोन दिवसात पावसाचा रुद्रावतार पाहताना नागरिक भीतीच्या छायेखाली वावरताना दिसत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते किसन सुंठकर व काही नागरिकांनी गटारी स्वच्छ केल्या आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी संभाव्य धोका ओळखून वेळीच गटारी स्वच्छ करणे गरजेचे होते. तरी प्रशासनाने नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली आहे. यामुळे नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी गटारीत उतरून स्वच्छता मोहीम राबविली. आता तरी प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न स्थानिकांकडून केला जात आहे.