प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मत व्यक्त
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील विविध समुद्रकिनाऱयांवर असलेल्या शॅकमधून सोडण्यात येणाऱया सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पर्यटन खात्याने घ्यावी, अशी सूचना करण्याचा निर्णय गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे.
मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत किनाऱयांवरील शॅकमधून सोडण्यात येणाऱया सांडपाण्यामुळे होणाऱया प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. या शॅकमधून सोडण्यात येणारे सांडपाणी सिव्हरेज लाईनला जोडणे शक्य नाही. त्यामुळे शॅकमालकांना तसा आदेश देता येणार नाही. कारण किनाऱयांवर सिव्हरेज पाईपलाईन टाकणे हे किनारी विभाग नियंत्रणाच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे ठरू शकते, असा विचार बैठकीत व्यक्त झाला. त्यापेक्षा प्रत्येक शॅकमालकाने स्वतःच्या सांडपाण्याचा योग्य निचरा होईल याची खबरदारी घेणे व त्यासाठी जमिनीत मोठी टाकी बसवून त्यात सांडपाणी गोळा करण्याची व्यवस्था करणे, हाच त्यावर योग्य उपाय ठरू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले.
तसेच हे सांडपाणी नियमित कालावधीत टँकरद्वारे भरून सिवरेज प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था पर्यटन खात्यातर्फे करण्यात यावी, अशी सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. समुद्रकिनाऱयांवर शॅक स्थापन करण्यास पर्यटन खातेच मान्यता देत असल्याने त्यांच्या सांडपाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची जबाबदारीही पर्यटन खात्याचीच असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.