आपली शेती वाचविण्यासाठी इतर शेतकऱयांच्या जागेतून मार्ग केल्याचा आरोप : बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाबाबत आश्वासन दिल्यानंतर माघार
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्ग चुकीच्या पद्धतीने करण्यात येत आहे. खासदार मंगला अंगडी यांनी आपली शेती वाचविण्यासाठी दुसऱया शेतकऱयांच्या जागेतून हा मार्ग केल्याचा आरोप करत शेतकऱयांनी पुन्हा आंदोलन केले. खासदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करून आंदोलन छेडले. त्याचबरोबर काडा कार्यालयाला कुलूपदेखील लावला. त्यामुळे खासदार त्या ठिकाणी आल्या. त्यावेळी आठ दिवसांत तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱयांनी आंदोलन मागे घेतले.
काडा कार्यालयाला लावला कुलूप
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गामध्ये नंदिहळ्ळी, गर्लगुंजी यासह इतर परिसरातील शेतकऱयांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. याचबरोबर खासदार मंगला अंगडी यांनी आपली जमीन वाचविण्यासाठी रेल्वेमार्ग बदलल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. गेल्या महिन्यामध्ये हा रेल्वेमार्ग बदलावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱयांनी दिला
होता.
जिल्हा पंचायतमध्ये बैठक होती. त्यामुळे खासदार मंगला अंगडी त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यामुळे शेतकरी त्यांना घेराव घालण्याच्या तयारीत होते. मात्र पोलिसांनी शेतकऱयांना अडवून धरले. त्यामुळे शेतकरी कित्तूर चन्नम्मा चौक येथे गेले. त्या ठिकाणी ठाण मांडून खासदारांविरोधात आंदोलन सुरू केले. काडा कार्यालयात जाऊन प्रवेशद्वाराला कुलूप लावला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
जिल्हय़ातील खासदारांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
या घटनेची माहिती खासदार मंगला अंगडी यांना देण्यात आली. त्यांनी आंदोलनस्थळी जावून शेतकऱयांची समजूत काढली. येत्या आठ दिवसांत योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबरोबर चर्चा करू, असे त्यांनी यावेळी सांगितले. येत्या आठ दिवसांत जर रेल्वेमार्गात बदल केला नाही तर जिल्हय़ातील सर्व खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.
रयत संघटनेचे चुन्नाप्पा पुजेरी, रवी सिद्धण्णावर, रामलिंग जाधव, किरण लोंढे, मारुती लोकूर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.