नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लखीमपूर खेरी घटनेविरोधात संयुक्त शेतकरी संघटनेने पुकारलेल्या रेल्वेरोको आंदोलनामुळे सोमवारी रेल्वेसेवा प्रभावित झाल्याचे दिसून आले. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱयांनी रेल्वेमार्गांवर ठाण मांडल्याने बऱयाच भागातील सेवा प्रभावित झाली होती. या निदर्शनांचा जास्त प्रभाव उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्हय़ांमध्ये दिसून आला. सकाळच्या सत्रातच शेतकऱयांनी मुझफ्फरनगरमधील रेल्वे ट्रक अडवला होता. गाझियाबादमध्येही शेतकऱयांनी रेल्वेगाडय़ा रोखल्या. मात्र, या आंदोलनादरम्यान अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांमध्ये कोणताही अडथळा आणण्यात आला नाही.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये 3 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारच्या तीन काळय़ा कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांनी शांततेने मोर्चा काढला होता. त्यावेळी आशिष मिश्रा यांच्या ताफ्यातील दोन वाहनांनी मोर्चातील 8 जणांना चिरडले. त्यात 4 शेतकऱयांचा तर एका पत्रकाराचा समावेश होता. यावरून मोठा हिंसाचार उसळला. यानंतर पोलिसांनी आशिष मिश्रा याची कसून चौकशी करत अटक केली. आशिष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आहे. अजय मिश्रा यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी शेतकऱयांनी सोमवारी रेलरोको आंदोलन केले.
लखीमपूर जिल्हय़ात अतिरिक्त सुरक्षा
लखीमपूर खेरी येथील गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करत शेतकऱयांनी या रेलरोको आंदोलनाची घोषणा केली होती. देशभरात विविध ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रेलरोको आंदोलन करण्यात आहे. या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या लखीमपूर खेरीमध्ये अतिरिक्त सुरक्षा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. कडक सुरक्षेमुळे कोणत्याही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली नाही. आंदोलनकर्त्यांनी गोंधळ घातल्यास रासुका अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
राजधानी लखनौमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. तसेच सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या चार तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच अन्य 14 संवेदनशील जिह्यांमध्येही सीआरपीएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले होते. पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिह्यात एक अतिरिक्त वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आला होता, असे उत्तर प्रदेशचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र
लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांडातील शहीदांच्या अस्थीसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब आणि इतर राज्यांमध्ये शहीद कलश यात्रा काढल्या जात असल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली. यात मोठय़ा संख्येने लोक सामील होत आहेत. रेलरोको आंदोलनानंतरही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. देशभरातील शेतकरी नेते भेटून पुढील योजना आखतील, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. पुढील आंदोलन वेगवेगळय़ा जिह्यात वेगवेगळय़ा ठिकाणी होणार आहे. केंद्र सरकारने अजून आम्हाला चर्चेसाठी बोलावले नाही, असे शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.