प्रतिनिधी/बेळगाव :
केंद्र व राज्य सरकार शेतकऱयांसाठी दरवषी फसल विमा योजना राबविते. या योजनेचा लाभ शेतकरी घेत असतात. मात्र अजूनही मोठय़ा प्रमाणात शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तेंव्हा शेतकऱयांपर्यंत या योजनेची माहिती द्या आणि विमा भरुन घ्या, असे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी कृषी अधिकाऱयांसह इतर अधिकाऱयांना सांगितले. विमा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत आहे. मूग पिकासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयास व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही सुचना करण्यात आली आहे. लहरी हवामानामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसत आहे. मागील वषी महापूरामुळे शेतकऱयांना फटका बसला होता. त्यामुळे फसल विमा योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱयाने घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भात, सोयाबिन, कापूस, मूग, जोंधळा, मका, उडीद, बटाटा, कोबी, कुळीत या पिकांना हा विमा आहे. याबाबत शेतकऱयांना माहिती द्यावी, प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हा विमा घेतला जातो. तेंव्हा शेतकऱयांनी बँकेत जाऊन हा विमा भरावा. 31 जुलैपर्यंत शेतकऱयांनी हा विमा राष्ट्रीयकृत बँकांबरोबरच कृषी शेतकरी संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक येथे हा विमा भरावा, असे कळविण्यात आले.
या बैठकीला जिह्याचे कृषी उपसंचालक झिलाणी मोकाशी, चिकोडी विभागाचे कृषी अधिकारी एल. आय. रुडगी, बेळगाव विभागाचे कृषी अधिकारी एस. बी. कोळेकर, प्रांताधिकारी अशोक तेली, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे हलगुंडी, बागायत खात्याचे जिल्हा प्रमुख रविंद्र हकाटी, तहसीलदार कुलकर्णी, कृषी अधिकारी अल्ताफ हुसेन यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.