कायद्यानुसारच काम करण्याचे आश्वासन
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात न्यायालयाने मनाई दिली असतानाही अचानकपणे मंगळवारी कंत्राटदार पुन्हा रस्ता करण्यास दाखल झाला. त्यामुळे शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध करून काम बंद पाडले. त्यानंतर बुधवारी शेतकऱयांनी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलान बिस्वास यांची भेट घेतली. त्यांना न्यायालयाची प्रत दाखविली. बिस्वास यांनी अधिकाऱयांना शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेऊन तसेच न्यायालयाची स्थगिती असताना काम करू नका, असे सांगितले. त्याचबरोबर शेतकऱयांना यावेळी दिलासाही दिला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, शेतकऱयांनी त्या विरोधात रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढादेखील दिला आहे. सध्या न्यायालयाने त्या कामाला स्थगिती दिली आहे. शेतकऱयांनी झिरो पॉईंटसंदर्भात अमलान बिस्वास यांना माहिती दिली.
त्यामुळे त्यांनी अधिकाऱयांना झिरो पॉईंट कोठे आहे आणि तुम्ही जागा कोणती घेता? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रांताधिकारी अशोक तेली यांना बोलावून घेऊन त्यांनाही सूचना केल्या आहेत. शेतकऱयांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्न करा, असे त्यांनी सांगितले. न्यायालयात दावा दाखल असताना पोलीस अधिकाऱयांनी शेतकऱयांची बैठक घेऊन त्यांना दडपशाही करणे योग्य नाही. तेव्हा न्यायालयाच्या आदेशानंतरच या कामाला सुरुवात करा, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर शेतकऱयांना त्यांनी योग्य तो न्याय देऊ, असे आश्वासन दिले. यावेळी राजू मरवे, प्रकाश नायक, भोमेश बिर्जे, जयश्री गुरण्णावर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.