कृषि राज्यमंत्री आयुक्तांसह नुकसानीची पहाणी करणार
सांगली / प्रतिनिधी
अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीनुकसानीच्या पंचनाम्यांचे आदेश अखेर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढले आहेत. 1 ते 4 डिसेंबर या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि विभागाला दिले आहेत. दरम्यान कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषि आयुक्तांसह आज मिरज, तासगाव, पलूस आणि कडेगाव तालुक्यात नुकसानीची पहाणी करणार आहेत.
गेल्या आठवडयापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. दोन डिसेंबर रोजी तर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे द्राक्ष,डाळींब, या फळपिकाबरोबर शेतीमालाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्षाचे तर सुमारे बारा हजार हेक्टरवरील शंभर टक्के नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा नजरअंदाज आहे. घड कुज, दावण्या आणि मणी फुटण्यामुळे शेतकरी आणि द्राक्षबागा उध्वस्त झाल्या आहेत. तरीही प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले नाहीत. तसेच विमा कंपन्याकडूनही शेतकऱ्यांची दखल घेतली जात नसल्याने दुहेरी अडचणीत सापडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. खा. संजय पाटील यांनीही तात्काळ पंचनामे करून शेतकऱयांना मदत देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कृषि विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील शेती पिके आणि फळपिकांचे पंचनामे करून 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या 13 मे 2015 रोजीच्या आदेशातील निकषानुसार पंचनामे करण्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धिरजकुमार यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आज नुकसानीची पहाणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी करणार आहेत. तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला ते भेटी देणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा निर्माण झाली आहे.